डॉ. गिरीधर बाबू यांची राज्य सरकारकडे शिफारस
प्रतिनिधी / बेंगळूर
बेंगळूरमधील कोरोना संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी 14 दिवस लॉकडाऊन करा. बेड्सची कमतरता दूर करण्यासाठी स्वच्छेने रुग्णालयातील बेड्स देण्यास तयार झालेल्या रुग्णालयाचे व्यवस्थापन राज्य सरकारने करावे. आवश्यकता भासल्यास सर्व रुग्णालयातील बेड्स सरकारने ताब्यात घ्यावेत, अशी शिफारस कोविड तांत्रिक सल्लागार समितीचे सदस्य डॉ. गिरीधर बाबू यांनी सरकारकडे केली आहे.
बेंगळुरात दररोज 15 हजारांवर नवे रुग्ण आढळून येत असल्याने शहरातील सक्रिय रुग्णसंख्या 1.62 लाखांवर गेली आहे. अशाच पद्धतीने रुग्णांची वाढ झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्मयता आहे. त्यामुळे बाधितांची साखळी तोडण्यासाठी शहरात 14 दिवस लॉकडाऊन करणे अनिवार्य आहे. तसेच अलीकडे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत मी 15 दिवस लॉकडाऊन जारी करण्याची वैयक्तिक शिफारस केली होती, असे त्यांनी सांगितले.
कोरोनाबधितांची संख्या वाढतच गेल्यास बेड्सची समस्या निर्माण होते. सरकारने खासगी रुग्णालयांना 50 टक्के बेड्स राखीव ठेवण्याची सूचना केली आहे. त्यानंतरही बेड्सची कमतरता भासल्यास आणखी थोडे बेड्स मागण्यास न जाता त्यापूर्वीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. सद्य परिस्थितीत संपूर्ण बेड्स पुरवण्यासाठी कोणती रुग्णालये पुढे येतील, त्याचे सरकारनेच व्यवस्थापन केले पाहिजे. गरज भासल्यास खासगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा सल्लाही सरकारला दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.
सावधगिरी बाळगणे सरकारच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. गंभीर आजार असलेल्यांना बेड्स, औषध व उपचार देण्याकडे अधिक लक्ष ध्यावे. अन्यथा मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचेही डॉ. बाबू यांनी दिला आहे.