उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांची माहिती
प्रतिनिधी / बेंगळूर
राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे दर्जेदार शिक्षणाची आवश्यकता असल्याने बेंगळूरमधील 28 विधानसभा मतदारसंघांमध्ये दर्जेदार पदवी महाविद्यालये स्थापन करण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी दिली.
बेंगळूरमध्ये सोमवारी उच्च शिक्षण खात्याच्या प्रगती आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. गुणवत्तापूर्ण शिक्षण, अध्ययन आणि संशोधन हाच राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मूळ उद्देश आहे. त्यानुसार बेंगळूरमध्ये ज्ञानभारती आणि बेंगळूर उत्तर विभागातील कोलार आणि बेंगळूर सेंट्रल विभागातील सेंट्रल विद्यापीठांमार्फतच बेंगळूरमधील विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये पदवी महाविद्यालये सुरू करून गुणात्मक शिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या संख्येनुरुप महाविद्यालये
बेंगळूरची लोकसंख्या दीड कोटींच्या वर गेली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या संख्येनुरुप महाविद्यालयांची संख्याही वाढविणे आवश्यक आहे. खासगी महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेण्याची परिस्थिती नसणाऱया आर्थिक आणि सामाजिकदृष्टय़ा मागे असणाऱया हजारो विद्यार्थ्यांना नव्या महाविद्यालयांमुळे शिक्षण मिळणार आहे. या महाविद्यालयांसाठी सरकारकडूनच जमिनी देण्यात येतील, असेही ते म्हणाले.
8 हजार प्राध्यापक नेमणुकीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
राज्यातील पदवी महाविद्यालयांमध्ये अध्यापकांची कमतरता आहे. शिवाय आणखी 8 हजार प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी मंजुरी देण्याची विनंती अर्थखात्याकडे करण्यात आली आहे. सध्या रिक्त असणाऱया पदांची भरती करण्यासाठी मंजुरी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्याकडे करण्यात आली आहे. शिवाय उच्च शिक्षण खात्याला मिळणारे अनुदानही कमी झाले आहे. राज्यातील अर्थसंकल्पाच्या 3.5 टक्के रक्कम उच्च शिक्षण खात्यासाठी राखीव ठेवण्याची विनंतीही करण्यात आल्याचे ते म्हणाले.