बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयांमधील ५० टक्के बेड राखीव ठेवण्याचे आदेश दिले होते. पण काही खासगी रुग्णालयांनी आदेशाचे पालन न करता कोरोना रुग्णांसाठी बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत होते. याची माहिती प्रशासनाला मिळताच कोरोनाच्या सरकारी कोट्यातील ५० टक्के बेड राखून न ठेवल्याबद्दल बीबीएमपीने ३६ खासगी रुग्णालयांना नोटीस बजावली होती. यांनतर काही दिवसांपूर्वीच डॉक्टरांच्या कमतरतेसंदर्भात रुग्णालय व्यवस्थापनाने आपले म्हणणे मांडले होते.
नोटीस मिळालेल्या रुग्णालयांपैकी एक नारायण हेल्थ केअर येथीलअधिकाऱ्याने म्हंटले आहे की साथीच्या रोगाची लागण सुरू झाल्यापासून त्यांचे २७० आरोग्य कर्मचारी संक्रमित आहेत. सरकारकडून कोणताही पाठिंबा न घेता रुग्णालय स्वखर्चाने त्यांच्यावर उपचार करीत आहे.
त्यामुळे “बेड रूग्णांवर उपचार करत नाहीत, डॉक्टर रूग्णांवर उपचार करतात”. कोविड आयसीयू आणि वॉर्ड व्यवस्थापित करण्यासाठी आमच्याकडे केवळ चार वरिष्ठ डॉक्टर आणि सहा ज्युनियर असिस्टंट डॉक्टर आहेत, असे नारायण हेल्थचे कार्यकारी संचालक वीरन शेट्टी यांनी म्हंटले आहे. तसेच रुग्णालयात आतापर्यंत सरकारने पाठविलेल्या ९६६ कोविड -१९ रुग्णांवर उपचार केले आहेत. कोरोना उद्रेक झाल्यापासून आम्ही ३ हजार पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार केले आहेत. आता आम्ही आपल्या शहरातील (कॅम्पस) १६० बीबीएमपीने पाठवलेल्या रुग्णांवर उपचार करीत आहोत आणि आणखी १५० रुग्णांना थेट रुग्णालयात दाखल करून घेतले आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.
कोरोना प्रभागातील एकूण ३५ आरोग्यसेवा कर्मचारी सध्या सकारात्मक व उपचार घेत आहेत. आमचे डॉक्टर थकले आहेत आणि त्यांनी अनेक आठवडे आपल्या कुटुंबियांना पाहिलेले नाही. अधिक रूग्णांचे व्यवस्थापन कसे करावे? कोविड हा भारतातील एकमेव रोग नाही, उपचाराच्या प्रतीक्षा यादीमध्ये शेकडो रुग्ण आहेत, असेही ते म्हणाले. आमच्या आयसीयूमध्ये कर्करोगाचे रुग्ण, ह्रदयाचे रुग्ण, मूत्रपिंड निकामी झालेल्या रूग्ण, हृदयाला होल असलेली मुले … ते कुठे जाणार आहेत? असा प्रश्न त्यांनी प्रशासनाला केला आहे.