दोन महिन्यांनतर धावली प्रवासी रेल्वे, देशातील पहिली पॅसेंजर रेल्वे आली बेळगावला
प्रतिनिधी/ बेळगाव
तब्बल दोन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा एकदा प्रवासी रेल्वेचे इंजिन रूळावर आले आहे. राज्यांतर्गत धावणारी देशातील पहिली रेल्वे शुक्रवारी बेंगळूरवरू बेळगावमध्ये दाखल झाली. प्रवासी वाहतूक सुरू झाल्यामुळे प्रवाशांमध्ये उत्साह पसरला आहे. पहिल्याच दिवशी 176 प्रवासी बेळगावमध्ये दाखल झाले. प्रवाशांची संख्या कमी असली तरी ही संख्या वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळी 8 वा. बेंगळूरमधून ही रेल्वे बेळगावच्या दिशेने रवाना झाली. प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करूनच त्यांना रेल्वेत प्रवेश देण्यात आला. मास्क, सॅनिटायझरचा वापर करूनच प्रवासी दाखल होत होते. सायंकाळी 6.45 वा ही रेल्वे बेळगावमध्ये दाखल झाली. गावी परतल्याचा उत्साह प्रवाशांमध्ये दिसून येत होता. 14 डब्यांच्या या गाडीमध्ये 1484 प्रवाशांची क्षमता होती. पहिल्या दिवशी केवळ 338 प्रवाशांनी बुकिंग केले होते. ही पूर्णपणे नॉन एसी रेल्वे होती. 220 रूपये इतका माफक दर ठेवण्यात आला होता.
बेळगाव रेल्वेस्थानकावर रेल्वे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. आलेल्या प्रवाशांची एकाचवेळी गर्दी होवू नये याकरिता सोशल डिस्टसिंग मार्किंग करण्यात आले होते. आलेल्या प्रवाशांना रेल्वे विभागातर्फे आवश्यक सूचना करण्यात येत होत्या. रेल्वे संपूर्णपणे खाली झाल्यानंतर सॅनिटायझेशन करण्यात आले.
प्रवाशांची संख्या वाढेल
या स्पेशल रेल्वेची घोषणा अचानक करण्यात आली होती. तसेच तिकिट बुकिंग ऑनलाईन असल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना ते शक्मय नव्हते. परंतु शुक्रवारपासून राज्यातील महत्त्वाच्या सर्व रेल्वेस्थानकांवरील बुकिंग काऊंटर सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे शनिवारपासून रेल्वे प्रवाशांमध्ये वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.