अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर येथे विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. यावेळी त्यांच्यावर पोलिसांनी लाठीहल्ला केला. विद्यार्थ्यांवर अशा प्रकारे लाठीहल्ला केल्याने अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांवर अन्याय करणे योग्य नाही. तेव्हा या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
परीक्षेचे वेळापत्रक लवकर द्यावे. वेळेत परीक्षा घ्याव्यात, शुल्क आकारणी कमी करावी यासह इतर मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. त्यावेळी विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अचानकपणे लाठीहल्ला केला. आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करत असताना पोलिसांनी जो भ्याड हल्ला केला आहे, त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. कोणतेही कारण नसताना जो हल्ला झाला आहे तो अत्यंत गंभीर आहे. तेव्हा पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.
शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कृष्णकुमार जोशी, कृष्णा ए., नारायण बागी, सुहास हुग्गार, तन्मय वाचनुरे, शिवानंद बिज्जरगी, शिवप्रकाश नंदी, किरण दुकानदार, देवेंद्र सन्मण्णावर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.