प्रतिनिधी /बेंगळूर
पाणी बचतीच्या बाबतीत बेंगळूरमधील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने 100 टक्के प्रगती साधली आहे. विमानतळावर आता पाणी शुद्धीकरणाचे प्रमाण वाढले आहे. पाणीसाठा व योग्य वापरासाठी विमानतळावर अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
विमानतळ कँपसमध्ये पाणी साठविण्यासाठी व सदुपयोग करण्यासाठी 315 लहान टाक्या निर्माण करण्यात आल्या आहेत. तेथे पावसाचे पाणी साठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पाणी बचतीसाठी शक्य तितके प्रयत्न येथे केले जात आहेत. बेंगळूर महापालिकेकडून पुरवठा होणाऱया पाण्यावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी अशी उपाययोजना करण्यात आली आहे, अशी माहिती विमानतळाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.
विमानाने प्रवास करण्यासाठी येथे हजारोंच्या संख्येने प्रवासी येथे येतात. त्यामुळे पाण्याची आवश्यकता विचारात घेऊन बेंगळूर इंटरनॅशनल एअरपोर्ट लि. कंपनीने अनेक उपाययोजना हाती घेतल्या. पाण्याचे शुद्धीकरण व पुनर्वापर, कचऱयाची विल्हेवाट यासंबंधी उपाययोजना केल्या. 2.5 दशलक्ष लिटर क्षमतेच्या सांडपाण्याचे शुद्धीकरण करून त्याच्या पुनर्वापराची व्यवस्था विमानतळावर करण्यात आली आहे. या पाण्याचा वापर विमानतळावरील झाडे, अग्नीशामक व्यवस्था आणि वातानुकुलन व्यवस्थेसाठी वापर केला जात आहे.