मंगळवारी रात्रीपासून आठवडाभर जारी तज्ञाच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्र्यांचा निर्णय
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोनाचा फैलाव मोठय़ा प्रमाणात झाला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी राज्यात पुन्हा काही दिवसांसाठी लॉकडाऊन जारी करावा, अशी मागणी केली आहे. तज्ञांनी देखील हाच सल्ला सरकारला दिला आहे. याची दखल घेत मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी बेंगळूर शहर आणि ग्रामीण या दोन जिल्हय़ांमध्ये मंगळवारी रात्रीपासून आठवडाभर लॉकडाऊन जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी राज्यातील जिल्हाधिकाऱयांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करून येडियुराप्पा राज्यातही लॉकडाऊन जारी करावा का, याबाबत निर्णय घेण्याची शक्यत आहे.
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यातही बेंगळूरमध्ये दररोज उच्चांकी रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे काही दिवसांकरिता लॉकलाऊन जारी केल्यास कोरोनावर काही प्रमाणात नियंत्रण येण्यास मदत होईल, असा सल्ला तज्ञांनी दिला होता. राज्यात शक्य नसेल तर किमान बेंगळूरमध्ये तरी आठवडाभरासाठी लॉकडाऊन जारी करा, अशी मागणी मंत्र्यांनी केली होती. त्यामुळे शनिवारी रात्री यांनी बेंगळूर शहर आणि बेंगळूर ग्रामीण या दोन जिल्हय़ांमध्ये आठवडभरासाठी लॉकलाऊन जारी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मंगळवार दि. 14 जुलै रोजी रात्री 8 पासून 23 जुलै रोजी पहाटे 5 पर्यंत दोन्ही जिल्हे संपूण लॉकडाऊन करण्यात येणार आहेत. या कालावधीत वैद्यकीय सेवा, मेडिकल, भाजीपाला, फळे, दूध तसेच जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
अधिकाऱयांचा विरोध
राज्यात लॉकडाऊन जारी करण्याबाबत मंत्र्यांनी समर्थनाची भूमिका घेतली असली तरी अर्थखात्यासह अनेक खात्यांमधील वरिष्ठ अधिकाऱयांनी विरोध दर्शविला आहे. लॉकलाऊन जारी केल्यास राज्याची आर्थिक स्थिती आणखी बिघडेल, असे अधिकाऱयांचे म्हणणे आहे.