साटेली-भेडशी ग्रामस्थांनी वेधले तहसीलदारांचे लक्ष
प्रतिनिधी / साटेली-भेडशी:
साटेली-भेडशी भोमवाडी येथील गायरान सर्व्हे नं.116/4 लगतच्या शेतकऱयांच्या वैयक्तिक जागेवर अतिक्रमण करून बेकायदेशीरपणे चिरेखाण व्यवसाय सुरू असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवत असल्याने दोडामार्ग तहसीलदारांनी तात्काळ पाहणी करून उत्खनन करणाऱया व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी येथील जमीनमालक शेतकऱयांनी निवेदनाद्वारे केली आहे.
यामध्ये राघोबा राणे, लक्ष्मी धर्णे, सुशिला धर्णे, चंद्रकला धर्णे, रुपावती धर्णे, नारायण धर्णे, सुधाकर धर्णे, प्रभाकर धर्णे, चंद्रकांत धर्णे, योगेश धर्णे, शिवराम धर्णे, निळू धर्णे, सिद्धेश धर्णे, राजाराम मयेकर, रामा धर्णे, नागेश धर्णे, रामचंद्र धर्णे आदी शेतकरी व ग्रामस्थांनी सह्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, साटेली-भेडशी भोमवाडी येथे शासनाची गायरान अशी नोंद असलेली जमीन आहे. वर्षानुवर्षे येथील शेतकरी आपली गुरे चरण्यासाठी या गायरान क्षेत्राचा वापर करत आहेत. मात्र, अलिकडील काही वर्षात माळरानावर असलेली असंख्य आकेशिया आणि तत्सम प्रकारच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. आता या जागेवर शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे उत्खनन करून जांभा दगड काढून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविला जात आहे. त्याचबरोबर येथील काही शेतकऱयांच्या वैयक्तिक जमिनीतही अतिक्रमण करून उत्खनन करण्यात येत आहे. याकडे तहसीलदारांनी लक्ष घालून बेकायदा उत्खनन करणाऱया व्यावसायिकांवर कारवाई करावी. त्याचबरोबर शासनाच्या जमिनीचा वापर कारखाना, उद्योग निर्मिती, पुनर्वसन यासाठी विचार व्हावा, असेही म्हटले आहे.