मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश : सां जुझे दी आरियाल भूखंड घोटाळा प्रकरण
प्रतिनिधी /पणजी
दक्षिण गोव्यातील सां. जुझे दी. आरियाल या गावात बेकायदेशीररीत्या शेकडो प्लॉट करून विकल्याप्रकरणी मायणा कुडतरी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
सां जुझे दी आरियाल व्हिलेजर्स युनियन या संघटनेतर्फे अध्यक्ष फिडिलीस प्रेडी त्रावासो यांनी उच्च न्यायालयासमोर याचिका सादर केली होती. याचिकादाराच्या वतीने ऍड. गजेंद्र उसगांवकर यांनी बाजू मांडली.
नगर नियोजन कायद्याचे सर्व नियम धाब्यावर बसवून शेकडो भूखंड बनविण्यात आले आहेत. क्रीडा संकुलासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जमिनीसाठी अक्रिमण करण्यात आले आहे. मोठय़ा भूखंडाचे प्लॉट पाडून विकण्यात आले. त्याचे रुपांतर न करता स्थानिक पंचायत परवाने देऊ लागली. या संघटनेने हरकत घेताच परवाने मागे घेतले गेले. पण बेकायदेशीर बांधकामे काही थांबली नाहीत.
तक्रार देऊनही पोलीस गप्पच
पोलीस स्थानकात तक्रार देऊनही पोलीस गप्प बसले आहेत. जे भूखंड विकण्यात आले आहेत. त्यापैकी काही जमीन जलस्रोत खात्याने ताब्यात घेतली आहे. रस्ता रुंदीकरणसाठी जागा सोडण्यात आलेली नाही. कोकण रेल्वेनेआणि दक्षिण पश्चिम रेल्वेने ताब्यात घेतलेली जमीन प्रादेशिक आराखडय़ावर दर्शविणे आवश्यक आहे. सां जुझे दी आरियाल भूखंड घोटाळय़ाची चौकशी आवश्यक असून यासंबधी गुन्हा नोंदवून घेण्याचा आदेश पोलिसांना द्यावा, अशी याचना न्यायपीठाकडे करण्यात आली. यावर न्यायपीठाकडे ऍडव्होकेट जनरल देविदास पांगम यांच्याकडे विचारणा केली, तेव्हा गुन्हा नोंदवून घेण्यास हरकत नसल्याचे त्यांनी न्यायपीठाला सांगितले. त्याप्रमाणे गुन्हा नोंदवून घेण्याचा आदेश न्यायपीठाने मायणा कुडतरी पोलिसांना दिला.