‘युएनएससी’त भारताची पाकिस्तानला फटकार
वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्र
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (युएनएससी) काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल भारताने पाकिस्तानवर पुन्हा एकदा जोरदार ताशेरे ओढले. जम्मू-काश्मीरमधील बेकायदेशीर ताब्यात असलेले सर्व क्षेत्र पाकिस्तानने त्वरित रिकामे करण्याचा इशारा भारताने दिला आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या प्लॅटफॉर्मचा गैरवापर पाकिस्तानकडून होत असल्याचा दावाही संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी मिशनच्या सल्लागार काजल भट यांनी केला. त्याचबरोबर जम्मू-काश्मीर आणि लडाख हे संपूर्ण केंद्रशासित प्रदेश भारताचे अविभाज्य भाग असल्याची भारताची स्पष्ट भूमिका असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भारताच्या स्थायी मिशनच्या सल्लागाराने काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल पाकिस्तानवर टीका केली. जम्मू-काश्मीर आणि लडाखचा संपूर्ण केंद्रशासित प्रदेश नेहमीच भारताचा अविभाज्य भाग होता, यामध्ये पाकिस्तानच्या बेकायदेशीर ताब्यात असलेल्या भागांचा समावेश होत असल्यामुळे यापुढे कधीही पाकिस्तानने त्यावर आपला दावा सांगू नये, असे ‘युएन’मधील भारताच्या स्थायी मिशनमधील सल्लागार डॉ. काजल भट यांनी स्पष्ट केले.
भारत नेहमीच पाकिस्तानपुरस्कृत सीमापार दहशतवादाच्या विरोधात कठोर आणि निर्णायक कारवाई करत राहील. तसेच अर्थपूर्ण संवादासाठी भारत पुढाकार घेऊ शकतो. मात्र, दहशतवाद, शत्रुत्त्व आणि हिंसाचारापासून दूर राहिल्यानंतर अनुकूल वातावरण निर्माण झाले तरच पाकिस्तानशी समाधानकारक बोलणी होऊ शकतात, असेही भट यांनी स्पष्ट केले. भारताला पाकिस्तानसह सर्व शेजारी देशांशी सामान्य संबंध हवे आहेत आणि सिमला करार तसेच लाहोर घोषणेनुसार कोणत्याही प्रलंबित समस्यांचे द्विपक्षीय आणि शांततेने निराकरण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचेही पुढे त्यांनी सांगितले.
पाकिस्तानवर जोरदार शाब्दिक हल्लाबोल
पाकिस्तानला एक प्रस्थापित इतिहास आहे आणि दहशतवाद्यांना आश्रय देणे, मदत करणे आणि सक्रियपणे पाठिंबा देणे हे सदस्य राष्ट्रांना माहीत आहे. दहशतवाद्यांना पाठिंबा, प्रशिक्षण, वित्तपुरवठा आणि शस्त्रे पुरविणे ही या देशाची सवयच बनलेली आहे. अशा स्थितीतही पाकिस्तानच्या प्रतिनिधीने भारताविरुद्ध चुकीचा प्रचार करण्यासाठी संयुक्त राष्ट्राचे व्यासपीठ वापरणे कितपत योग्य आहे? असा सवाल भट यांनी केला. पाकिस्तानकडून ‘युएनएससी’चा गैरवापर होण्याची ही पहिलीच वेळ नसल्यावर त्यांनी जोर दिला. तसेच भारताकडे अंगुलीनिर्देश करत पाकिस्तानचे प्रतिनिधी स्वतःच्या चुकांवर पांघरुण घालत असल्याचेही त्यांनी सांगितले.