बेळगाव / प्रतिनिधी
राज्यात ग्राम पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सोमवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. बेकिनकेरे ग्राम पंचायतमध्ये बेकिनकेरे व अतिवाड गावांतून 37 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 7 जणांनी सोमवारी माघार घेतली आहे. त्यामुळे उर्वरित 30 उमेदवारांमध्ये निवडणूक रंगणार आहे.
मंगळवारपासून प्रचार सुरू होणार असल्याने उमेदवारांकडून प्रचाराची तयारी सुरू झाली असून आश्वासनांचा पाऊस पडणार आहे. बेकिनकेरे ग्राम पंचायतमध्ये 13 जागांसाठी 37 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. बेकिनकेरेतील तीन तर अतिवाडमधील एका वॉर्डामधून ही निवडणूक होणार आहे. बेकिनकेरे ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात अतिवाड गावचा समावेश आहे. त्यामुळे दोन्ही गावांतून अर्ज भरलेल्या उमेदवारांकडून विजय खेचून अणण्यासाठी गावपातळीवर मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
वॉर्ड क्र. 1 मधून छबुताई शंकर कांबळे, वॉर्ड क्र. 2 मधून कल्पना कृष्णा कांबळे तर वॉर्ड क्र. 3 मधून लक्ष्मी सोमनाथ सावंत यांच्या विरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याने त्यांची यापूर्वी बिनविरोध म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे उर्वरित 10 जागांसाठी चुरस निर्माण होणार आहे. अर्ज दाखल केलेले सर्व उमेदवार नवखे असल्याने निवडणुकीत रंगत निर्माण होणार आहे.
सुकाणू कमिटीचे प्रयत्न वाया
गावात आतापर्यंत 5 वेळा बिनविरोध निवडणूक झाली आहे. यंदादेखील सुकाणू कमिटीने बिनविरोध निवड करण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, काही युवा इच्छुक उमेदवारांनी त्याला नापसंती दर्शवून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. त्यामुळे सुकाणू कमिटीचे प्रयत्न आणि मागील 25 वर्षांपासून चालत आलेली बिनविरोधी निवडणुकीची परंपरा खंडित झाली आहे..