पुतळा विटंबनेमागे सुडाचे राजकारण : भाषिक वादाचा रंग मात्र उलटले बूमरँग : हिरेबागेवाडी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
प्रतिनिधी /बेळगाव
राष्ट्रपुरुषांचे अवमान, पुतळय़ांच्या विटंबनेनंतर साहजिकच जनक्षोभ भडकतो. विटंबना करणाऱयांवर कारवाई करावी, या मागणीसाठी आंदोलने सुरू होतात. वादावादी, हाणामारीच्या घटना घडतात. अनेकांना कारावास भोगावा लागतो. मात्र, अशा घटनांमागे राष्ट्रपुरुषांच्या अवमानापेक्षा स्वतःच्या अपमानाचा बदला घेण्याची विखारी मनःस्थिती दडलेली असते, हे पुन्हा एकदा सामोरे आले आहे.
भेंडिगेरी, ता. बेळगाव येथे गेल्या शनिवारी 21 मे रोजी क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा पुतळय़ाची विटंबना करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संगोळ्ळी रायण्णा यांचे पुतळे नेहमी लक्ष्य बनविले जातात. पुतळा विटंबना करण्यामागे कोणती मनःस्थिती असते? कोणत्या कारणासाठी विटंबनेचा कट रचला जातो? याची सविस्तर माहिती हिरेबागेवाडी पोलिसांनी मोठय़ा कष्टाने बाहेर काढली आहे.
अधिकाऱयांनी काढली पाळेमुळे खणून
संगोळ्ळी रायण्णा पुतळय़ाचा अवमान झाल्यानंतर पुतळा विटंबना करणाऱयांना त्वरित अटक करावी, या मागणीसाठी त्याच दिवशी गावात धरणे धरण्यात आले. ज्यांनी पुतळा विटंबनेसंबंधी पोलिसांत फिर्याद दिली होती, तो तरुणच या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आल्यानंतर तपास अधिकाऱयांनाही धक्का बसला आहे. हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर व त्यांच्या सहकाऱयांनी मोठय़ा धाडसाने या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढली.
या घटनेवरून जुन्या घटनांच्या कटू आठवणी ताज्या झाल्या आहेत. शासकीय यंत्रणेने बालविवाह रोखला म्हणून संगोळ्ळी रायण्णा पुतळा विटंबना आणि दिवंगत लोकप्रिय अभिनेते पुनीत राजकुमार यांच्या श्रद्धांजली फलकाची मोडतोड करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन नेमका तपास केला. या प्रकरणी पोलिसांत फिर्याद देणाऱया चंद्राप्पा कणबर्गी या तरुणाने तर मराठा समाजातील काही तरुणांची नावेही संशयित म्हणून दिली होती. आपल्या नात्यातील अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला, याचा वचपा काढण्यासाठी पुतळय़ाची विटंबना करून त्याचे खापर मराठा समाजावर फोडण्यात आले.
यापूर्वीही घडल्या अशा अनेक घटना
यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. भेंडिगेरी येथील घटनेसंबंधी चंद्राप्पा कणबर्गी रा. भेंडिगेरी, महांतेश करीगार, रा. शिंदोळी, बसवराज ऊर्फ देमाप्पा हुलमनी, अर्जुन शिवनायकर, दोघेही राहणार नेगिनहाळ या चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राणी कित्तूर चन्नम्मा, क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी राष्ट्रपुरुषांच्या पुतळय़ांची अनेक वेळा अशा पद्धतीने अवमान करून सुडाचे राजकारण केल्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत.
मध्यंतरी राणी कित्तूर चन्नम्मा चौकातील झेंडा गायब झाला होता. त्यावेळीही समाजकंटकांनी राणी चन्नम्मा यांच्या अश्वारुढ पुतळय़ाजवळील झेंडा पळविल्याची ओरड सुरू झाली. प्रत्यक्षात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी उसाच्या ट्रक्टरमधील उसांमध्ये अडकून झेंडा निघाल्याचे दिसून आले. कोर्ट कंपाऊंडमधील संगोळ्ळी रायण्णांच्या पुतळय़ाच्या हातातील तलवार तुटून पडली होती. झाड तोडताना फांदी पडून ही घटना घडली होती. सुरुवातीला कोणालाच विश्वास बसला नाही. नंतर सत्य कळाले. मात्र, तोवर पुतळय़ाच्या अवमानाची अफवा गावभर पसरवून वातावरण गढूळ बनविले होते.
गेल्या सहा महिन्यांपूर्वी कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगाव येथे भरले होते. त्या काळातही पुतळय़ांचा मुद्दा ठळक चर्चेत आला. 16 डिसेंबर 2021 रोजी बेंगळूर येथील भाष्यम सर्कलमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळय़ावर शाई फेकण्यात आली. दुसऱया दिवशी यासंबंधीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. धर्मवीर संभाजी चौक परिसरात शिवप्रेमींनी धरणे धरले. पुतळय़ाची विटंबना करणाऱयांवर कडक कारवाई करा, या मागणीसाठीचा तो धरणे कार्यक्रम होता. त्याच दिवशी रात्री वाहनांवर दगडफेकीचे प्रकार घडले. दुसऱया दिवशी 17 डिसेंबर रोजी अनगोळ येथे संगोळ्ळी रायण्णा पुतळय़ाची विटंबना झाल्याचे उघडकीस आले. त्यावेळीही संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जात होती.
अनेक ठिकाणी पुतळा विटंबनेच्या घटना
अलीकडच्या काळात जिल्हय़ातील अनेक ठिकाणी पुतळा विटंबनेच्या घटना घडल्या आहेत. काही अपवाद वगळता दोन जातींमध्ये अथवा भाषिकांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी समाजकंटकांनी पुतळा विटंबनेचा आधार घेतल्याचे अनेक प्रकरणांच्या तपासात अधोरेखित झाले आहे. चिकोडी तालुक्मयातील मांजरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळय़ाची फेब्रुवारीच्या दुसऱया पंधरवडय़ात विटंबना करण्यात आली होती. गावात दलित-सवर्ण वाद पेटविण्यासाठीच हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले होते. या प्रकरणी चौघा जणांना अटक करण्यात आली होती. विशेष म्हणजे अवमान प्रकरणात अटक झालेले डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी होते.
भेंडिगेरी प्रकरणातही संगोळ्ळी रायण्णांच्या अनुयायांनीच पुतळय़ाची विटंबना केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. वर्षभरात विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत. त्यामुळे जातीय, भाषिक तेढ निर्माण करण्यासाठी असे प्रयत्न वाढणार हे स्पष्ट आहे.
कुरबरहट्टीतील प्रकाराला जबाबदार कोण?
धामणेनजीकच्या कुरबरहट्टी येथे 26 मे रोजी लग्नाची वरात काढली होती. ही वरात बसस्थानकाजवळील संभाजी चौक परिसरात पोहोचली. त्यावेळी वरातीतील काही जणांनी संभाजी महाराजांच्या पुतळय़ाजवळ आतषबाजी सुरू केली. गावातील काही तरुणांनी त्याला आक्षेप घेतला. फटाके थोडे पुढे लावण्याची विनंती केली. केवळ या एकाच कारणावरून हाणामारीची घटना घडली. खरेतर रात्री दहानंतर ध्वनिक्षेपकाच्या वापरावर आता बंदी आहे. रात्री 10.30 नंतरही वरातीला परवानगी कोणी दिली होती? प्रत्यक्षात फटाके लावण्यावरून ही घटना घडली तरी वरातीत कन्नड गाण्यांवर डान्स केला म्हणून आमच्यावर हल्ला केला, अशी ओरड करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी मराठी तरुणांना टार्गेट केले आहे. रात्री उशिरापर्यंत वरात काढणाऱयांवर पोलिसांनी कोणती कारवाई केली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.