नावे गहाळ झाल्याने मतदानापासून वंचित, सर्वत्र संतापाची लाट
प्रतिनिधी /बेळगाव
वॉर्ड पुनर्रचनेबाबत तक्रार असताना राज्य निवडणूक आयोगाने घिसाडघाईने निवडणूक जाहीर केली. तसेच मतदारांची चाचणी करण्यापूर्वीच मतदारयादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे याचा फटका मतदारांना बसला असून महापालिका प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारामुळे मतदारांना मतदानापासून वंचित रहावे लागले. सर्वच मतदारसंघात हा प्रकार दिसून आल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
वॉर्ड पुनर्रचनेमुळे मतदारांच्या नावांचा घोळ झाल्याने नेमके कोणत्या मतदारयादीत नाव आहे व कोणत्या मतदान केंद्रावर मत घालायचे? याची माहिती मतदारांना मिळाली नाही. निवडणूक विभागाच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना बसल्याने भर उन्हात थांबून रहावे लागले. दक्षिण भागातील बहुतांश वॉर्डात प्रतिष्ठेच्या लढती होत्या. यामुळे जास्तीत जास्त मतदान करून घेण्याकडे उमेदवारांचा कल होता. या निवडणुकीत बहुतांश मतदारांची नावे रद्द झाल्याचे निदर्शनास आले. शहरात बहुतांश वॉर्डातील मतदारांची नावे गहाळ झाल्याने सर्वच मतदान केंद्रांवर गोंधळ उडाला होता.
निवडणुकीवेळी मतदान केंद्रांबाहेर मतदारांची नावे व मतदार क्रमांक पाहण्यासाठी मतदान केंद्राच्या आवारात टेबल लावण्यात आले होते. पण मतदारांची नावे मतदारयादीत नसल्याने गैरसोय झाली. काही नागरिक नेहमीप्रमाणे वॉर्डमधील मतदान केंद्रावर मतदानासाठी गेले. पण त्याठिकाणी मतदान नसल्याचे सांगण्यात आले. तसेच अन्य ठिकाणी मतदान करण्याची सूचना करण्यात आली. त्यामुळे सदर मतदारांना एका मतदान केंद्रातून दुसऱया मतदान केंद्रावर जावे लागले. याचा फटका वृद्ध नागरिकांना जास्त बसला.
घिसाडघाईचा मतदारांना फटका : माजी उपमहापौर रेणू मुतकेकर
महापालिका निवडणुकीसाठी घिसाडघाईने करण्यात आलेल्या वॉर्ड पुनर्रचनेचा फटका मतदारांना बसला आहे. घिसाडघाईने करण्यात आलेली वॉर्ड पुनर्रचना आणि मतदारयादींमुळे असंख्य मतदारांची नावे गहाळ झाली आहेत. काही मतदारांची नावे अन्य मतदान केंद्रावर घालण्यात आल्याने वृद्ध मतदारांची गैरसोय झाली आहे. मनपा प्रशासनाने शहरवासियांना विश्वासात घेतले नसल्याने मतदारांना हक्क बजावण्यापासून वंचित रहावे लागले. त्यामुळे यापुढे नागरिकांना विश्वासात घेऊन वॉर्ड पुनर्रचना व मतदारयादी करावी, अशी मागणी माजी महापौर रेणू मुतकेकर यांनी केली.