युवा समितीची जिल्हाधिकाऱयांकडे मागणी : कपिलतीर्थ तलावात मृत्यू झालेल्याच्या कुटुंबाला मदत करा
प्रतिनिधी / बेळगाव
कपिलतीर्थ तलावात रविवारी एका चिमुकल्याचा बुडून दुर्दैवी अंत झाला. महानगरपालिकेच्या अधिकाऱयांच्या दुर्लक्षामुळेच स्वराज मोरेचा मृत्यू झाला. त्यामुळे संबंधित अधिकाऱयांवर निलंबनाची कारवाई करावी, तसेच मोरे कुटुंबीयांना महानगरपालिकेने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी म. ए. युवा समितीच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकाऱयांना करण्यात आली.
कपिलेश्वर रोड येथे राहणाऱया स्वराज मोरे या 7 वषीय मुलाचा कपिलतीर्थ तलावात पडून दुर्दैवी अंत झाला. मागील सहा महिन्यांपासून कपिलतीर्थ तलावातील पाण्याचा उपसा झालेला नाही. तलावाची भिंतही काही समाजकंटकांनी फोडली आहे. त्यामुळे तलाव परिसरात कुणालाही प्रवेश करता येत आहे. यामुळे स्वराजचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याने त्या कुटुंबाला एक कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी, तसेच त्या कुटुंबातील एका व्यक्तीला महानगरपालिकेत नोकरी द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी निवेदन स्वीकारून याबाबत मनपा आयुक्तांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष सूरज कुडुचकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, उपाध्यक्ष अंकुश केसरकर, सचिन केळवेकर, विशाल गौंडाडकर, संतोष कृष्णाचे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. तसेच युवा समितीच्या पदाधिकाऱयांनी मनपा आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन दिले.