जंगलात सापडला मानवी सांगाडा : मुलाचा घातपाताचा संशय
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या दीड महिन्यापासून बेपत्ता असलेल्या बेटणे, ता. खानापूर येथील एका महिलेचा अद्याप शोध लागला नाही. दीड महिन्यानंतरही ही महिला कोठे गेली? ती सुरक्षित आहे की तिचा घातपात झाला आहे? याचा उलगडा झाला नाही. कुटुंबीयांनी आता जिल्हा पोलीसप्रमुखांकडे धाव घेतली आहे. या बेपत्ता प्रकरणाचे गूढ उकलण्याचे आव्हान खानापूर पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
रुक्मिणी यशवंत गावडे (वय 50) ही महिला 29 डिसेंबर 2021 पासून बेपत्ता झाली आहे. यासंबंधी तिचा मुलगा संतोष याने 5 जानेवारी 2022 रोजी खानापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. खानापूर पोलिसांनी या बेपत्ता महिलेच्या तपासात कोणताच रस दाखविला नाही. कुटुंबीयांची मात्र चिंता वाढली आहे.
उपलब्ध माहितीनुसार रुक्मिणी या गोव्यात कामाला होत्या. 28 डिसेंबर 2021 रोजी गोव्याहून त्या कणकुंबीला आल्या. त्या दिवशी कालमणी येथील नातेवाईकांच्या घरी त्या मुक्कामाला होत्या. दुसऱया दिवशीपासून त्या बेपत्ता झाल्या आहेत. व्यवसायाने प्लंबर असणाऱया त्यांच्या मुलाने यासंबंधी तक्रार दाखल केली आहे.
रुक्मिणी बेपत्ता झाल्याच्या महिन्यानंतर बेटणेजवळील जंगल परिसरात मानवी सांगाडा सापडला आहे. तपास अधिकारी व डॉक्टरांच्या मते सापडलेल्या दिवसापासून किमान एक महिना अगोदर मृत्यू झाला असावा. पोलिसांनी हा मानवी सांगाडा ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात पाठविला आहे. हा सांगाडा कोणाचा? याचा अद्याप शोध लागला नसला तरी रुक्मिणी यांच्या मुलाला मात्र आपल्या आईचा घातपात झाल्याचा संशय आहे.
पोलीसप्रमुखांकडे मांडली कैफियत
29 जानेवारी 2022 रोजी हा सांगाडा आढळून आला आहे. सुरुवातीपासूनच खानापूर पोलिसांचे तपासात सहकार्य मिळत नाही म्हणून रुक्मिणी यांच्या मुलाने जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. पोलीसप्रमुखांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी यांनी बेटणे जंगल परिसराला भेट देऊन पाहणी केली आहे.
ओळख पटविण्याचे प्रयत्न
हे प्रकरण जिल्हा पोलीसप्रमुखांपर्यंत पोहोचल्यानंतर पोलीस यंत्रणेला जाग आली आहे. डीएनए चाचणीच्या माध्यमातून मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बेटणे जंगल परिसरात आढळलेला मानवी सांगाडा रुक्मिणी यांचाच आहे का? याचा शोध घेण्यासाठी तिच्या मुलाचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. वैज्ञानिक पृथक्करणानंतरच यासंबंधीची माहिती उजेडात येणार असली तरी मुलाच्या मनात आपल्या आईचा घातपात झाल्याचा संशय पक्का आहे. यासंबंधी अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी यांच्याशी संपर्क साधला असता आपण स्वतः घटनास्थळाची पाहणी केली आहे. वैज्ञानिकरीत्या तपास हाती घेण्यात आला आहे. लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, असे ते म्हणाले.