मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती : दिल्ली भेटीत अनेक विकासकामांवर चर्चा : प्रकल्पांबाबत जनतेला विश्वास घेणा
प्रतिनिधी / पणजी
सागरमाला अंतर्गत येणाऱया अनेक प्रकल्पांपैकी चार प्रस्तावित प्रकल्प रद्द करण्यात आले असून बेतूल येथील मल्टिप्लेक्स टर्मिनलचाही त्यात समावेश आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. राज्यात सध्या अनेक प्रकल्पांना प्रखर विरोधही होत असून त्यासंबंधीच्या लोकभावना केंद्रीय मंत्र्यांपर्यंत पोहोचविल्या आहेत असे त्यांनी पुढे सांगितले. म्हादई तसेच खाणींच्या विषयावर मात्र कोणतीही चर्चा झाली नाही. ती पुढील भेटीत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दोन दिवसांच्या दिल्ली भेटीनंतर गोव्यात परतलेले मुख्यमंत्री बुधवारी आपल्या आल्तिनो निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. आपल्या भेटीत अनेक मंत्र्यांची भेट घेऊन राज्यातील विविध विकासकामे व प्रकल्पांवर सकारात्मक चर्चा केली. रस्ते व राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्याशी गोव्यात सध्या चालू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची कामे शक्य तेवढय़ा लवकर पूर्णत्वाकडे नेण्यासंबंधी चर्चा त्यांनी केली.
रेल्वे विस्तारीकरण, मच्छीमारी विषयी चर्चा
रेल्वेमंत्री पियुश गोयल यांच्याशी झालेल्या चर्चेत रेल्वे विस्तारीकरणास होणाऱया विरोधासंबंधी माहिती त्यांना देण्यात आली. जहाजोद्योग, रसायने आणि खतमंत्री मनसुख मांडवीय यांच्याशी पोर्टसंबंधीच्या विविध विशयांवर चर्चा करण्यात आली. मत्स्यउद्योगमंत्री गिरीराज यांच्याशी गोव्यातील मत्स्यसंपदा योजना प्रभावीपणे कशी राबविणे शक्य आहे, त्यासंदर्भात चर्चा झाली. आत्मनिर्रभर भारत, स्वयंपूर्ण गोवा या योजनेंतर्गत मत्स्यसंपदा, पशुसंवर्धन आणि दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी विविध प्रकल्प कशाप्रकारे राबविण्यात येतील त्यासंबंधी चर्चा झाली, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पंचायतमंत्र्यांचेही गोव्याला सहकार्याचे आश्वासन
आरडीए व पंचायतमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचीही भेट घेतली व विविध प्रकल्पांना चालना देण्यासंबंधी चर्चा केली. नॅशनल लायव्हलीहूड मिशन अंतर्गत अनेक प्रकल्प असून त्यात गोव्याला सहकार्य करण्याची तयारी तोमर यांनी दर्शविली असून प्रकल्प प्रस्ताव पाठविल्यास विचार करण्याचे आश्वासन दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
केंद्रीय शिष्टमंडळ एमपीटीस भेट देणार
राज्यात कोळसा वाहतुकीवरून लोकांचा प्रचंड विरोध चालू आहे. कोळशाचे प्रमाण वाढत राहिल्यास राज्यात प्रदूषण वाढणार असल्याची भीती लोक व्यक्त करत असल्याची माहिती मंत्री मांडविया यांना दिली. त्यावर बोलताना त्यांनी गोव्यात कोणत्याही परिस्थितीत कोळसा वाढणार नाही, असे आश्वासन दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गोव्यात सध्या 9 ते 10 दशलक्ष टन पर्यंत कोळसा वाहतूक होते. खाणी पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास हे प्रमाण आणखीही कमी होईल किंवा कायमस्वरुपी बंदही होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. तत्पूर्वी एका महिन्याच्या आत केंद्रीय शिष्टमंडळ एमपीटीस भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचेही सांगितले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गोव्यात कोळसा हाताळणी ही आपल्या कारकिर्दीपासून सुरू झालेली नाही. ती फार पूर्वीपासून सुरू आहे. तरीही काही विरोधक तसे चित्र निर्माण करत आहेत. काहींनी तर 130 दशलक्ष टन कोळसा गोव्यात येणार असल्याचा प्रचार सुरू केला आहे, याबद्दल मुख्यमंत्र्यांनी खेद व्यक्त केला.
एमपीटी अन्य उत्पादनांची हाताळणी करणार
2017 मध्ये 14 दशलक्ष टन कोळसा आला होता. गोव्यातून खनिजमाल निर्यातीत घट झाली तेव्हा एमपीटीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी त्यांनी कोळसा हाताळणीवर लक्ष केंद्रीत केले. तसेच अन्य विविध कार्गो हाताळणीसही प्रारंभ केला. खनिजमाल वगळता अन्य उत्पादनांचीही हाताळणी करण्याची योजना आहे. सध्या फार्मा निर्यात जेएनपीटीवरून करण्यात येते, ती बोट थेट येथे आल्यास येथूनच निर्यात करणे शक्य होणार आहे, असे बंदरमंत्र्यांनी सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
सागरमाला अंतर्गतचे चार प्रकल्प रद्द
पर्यटनाच्या दृष्टीकोनातूनही एमपीटीतील बर्थचा वापर करण्यावर भर देण्यात येणार आहे. मात्र सागरमाला अंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार त्यात येणाऱया अनेक प्रकल्पातील चार प्रमुख प्रस्तावित प्रकल्प हे संयुक्तिक नसल्याचे कारण देऊन एमपीटीने कळविले आहे, त्यामुळे ते रद्द करण्यात आले आहेत. त्यात बेतूल येथील मल्टिप्लेक्स टर्मिनलचाही समावेश असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
एमपीटीतील कोळसा हाताळणीचे प्रमाण कमी करून तेथे पर्यटन आणि अन्य उत्पादनांच्या हाताळणीस प्रोत्साहन देण्यात येईल. पोर्ट सध्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेट ऑफ आर्ट टर्मिनल विकसित करण्याच्या विचारात आहे. त्यात रो-रो सारख्या सेवा, शॉपिंग आर्केड, यासारखे प्रकल्प असतील.
मोलेचा तामनार प्रकल्प गोव्यासाठी फार महत्वाचा
मोले येथील प्रस्तावित तामनार प्रकल्प हा गोव्यासाठी फार महत्वाचा आहे. त्यावर या भेटीत विस्तृत चर्चा झाली. या प्रकल्पासाठी कोणत्याही परिस्थितीत मोले अभयारण्य नष्ट करण्यात येणार नाही. पर्यावरणालाही कोणत्याही प्रकारे बाधा आणण्यात येणार नाही, असे स्पष्ट करून विरोधकांनी विनाकारण आडकाठी आणू नये, तरीही एखादा प्रकल्प लोकांना नको असे तर सरकार त्यावर विचार करेल, हे सरकार लोकांचे म्हणणे ऐकून घेते, असे डॉ. सावंत यांनी एका प्रश्नावर सांगितले.
…………………बॉक्स…………………………………….
देशात आजही मोदी लाट : मुख्यमंत्री
बिहार विधानसभा निवडणूक निकालावरून आजही देशात मोदी लाटच आहे हे सिद्ध झाले आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या स्पष्ट बहुमत प्राप्त केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे. पी. नड्डा, नितीशकुमार, प्रभारी देवेंद्र फडणवीस आणि इतरांचे अभिनंदन केले. त्याशिवाय अन्य अनेक राज्यात झालेल्या पोटनिवडणुकांतही भाजपने नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले.
………………………………….(बॉक्स)……………………………
मुक्तीदिन सोहळ्यात यंदा केंद्रीय पर्यटनमंत्र्यांची उपस्थिती
येत्या 19 डिसेंबर रोजी गोव्याचा 60 वा मुक्तीदिन साजरा होणार असून त्यानिमित्त केंद्रीय पर्यटन आणि संस्कृतीमंत्री प्रल्हाद पटेल यांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांनी उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.