वार्ताहर / दाभाळ
फोंडा येथून बेतोडा निरंकालकडे जाणाऱया मुख्य रस्त्याच्या बाजूला वनखात्याच्या जमिनीत असलेली अनेक मोठी झाडे कोसळण्याच्या स्थितीत आहेत. एखाद्या धावत्या वाहनावर झाड कोसळल्यास अपघात होऊन जिवीतहानी होण्याचाही वाढता धोका आहे. पावसाळय़ापूर्वी ही धोकादायक झाडे कापून टाकण्याची मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.
निरंकाल बेतोडा व दाभाळकडे जाणारा हा मुख्य रस्ता असल्याने वाहनांची नेहमीच वर्दळ असते. हा रस्ता वनक्षेत्रातून जात असल्याने बऱयाच ठिकाणी वनखात्याच्या खासगी जागेत मोठय़ा प्रमाणात झाडे लागतात. बरीचशी झाडे रस्त्याच्या बाजूने झुकली असून वाहनांना त्यापासून कायम धोका आहे. रस्त्याच्या बाजूला डोंगराच्या पायथ्याशी असलेली माती पावसाळय़ात खचत असल्याने वादळी वाऱयाच्यावेळी झाडांची मोठय़ा प्रमाणात पडझड होऊन रस्त्यावर अडथळे व वीज वाहिन्या तुटण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी झालेल्या वादळी वाऱयाच्या तडाख्यात अनेक झाडे वीज वाहिन्यावर पडून बरेच वीज खांब जमीनदोस्त झाले होते. त्यामुळे या भागात 4 ते 5 दिवस वीज पुरवठा खंडित झाला होता. दूरध्वनी सेवाही ठप्प झाली होती. वीज खात्याला लाखो रुपयांचा फटका बसला होता. बेतोडा निरंकाल ग्रामसभेत नागरिकांनी वारंवार ही समस्या उपस्थित केली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात तत्कालीन सरपंच तेजस शेटकर, पंचसदस्य विकास प्रभू, चंद्रकांत सामंत यांनी वनखात्याच्या अधिकाऱयांसोबत धोकादायक झाडांचे सर्वेक्षण केले होते. सर्वेक्षणानंतर ही झाडे कापण्याची परवानगी वनखात्याने पंचायतीला दिली होती. मात्र सरपंच पदासाठी सुरु असलेल्या राजकीय हालचालीमुळे व त्यानंतर लॉकडाऊन झाल्याने हे काम रखडले. आता पावसाळा जवळ आला असून पंचायतीने संबंधित खात्याशी संपर्क साधून पावसाळय़ापूर्वी धोकादायक झाडे कापून टाकण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. वनखाते व पंचायतीकडून याकामी विलंब होत असल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते हेमंत सामंत व माजी सरपंच मधू खांडेपारकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एखादा अपघात होऊन त्यात लोकांचा जीव गेल्यानंतर सरकारी यंत्रणा जागी होईल काय ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.