प्रतिनिधी / शिरढोन
शिरोळ तालुक्यातील शिरढोन येथील एकाच कुटुंबातील तिघा सख्ख्या भावांचा पंधरा दिवसाच्या कालावधीत कोरोना संसर्गाने मृत्यू झाला होता. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नव्हती किंवा या भागात औषध फवारणी केली नव्हती. जाणीवपूर्वक याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. याबाबतची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विश्वास बालीघाटे व रावसाहेब पाटील यांनी शिरोळचे तहसीलदार अर्पणा मोरे व प्रांताधिकारी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यद्रावकर, यांना फोनवरून याबाबतची माहिती दिली .
याबाबतचे गांभीर्य लक्षात आणून दिले. त्यावेळी शिरोळच्या तहसीलदारांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. वैद्यकीय पथकाला पाचारण करून घरातील 26 व्यक्तींचा स्लॅब घरीच घेण्यात आला व घरातील व्यक्तींना तहसीलदार यांनी पूर्ण सूचना दिल्या. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे तब्बल आठ दिवसांनी शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. आणि या भागात औषध फवारणी करण्यात आली . दरम्यान आरोग्य सेवक सनदी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता गावामध्ये एकूण 60 बाधितांची संख्या असून पन्नास जण उपचार घेऊन बरे झाले आहेत तर आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दोघेजण उपचार घेत आहेत असे सांगितले.