तरुणाईच्या रोजगाराला लागले कोरोनाचे ग्रहण; शिकूनही नोकरी नाही त्यामुळे बायकोही नाही
अमर वांगडे / परळी
महाराष्ट्रातील सर्वात मोठा मानला जाणारा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी झाली की चाहूल लागते ती गुलाबी थंडीची आणि जवळ येतात ती तुळशीचे लग्न. दरवर्षी तुळशी विवाहानंतर लग्नाचे बार उडतात, सनई-चौघडे यांचा आवाज दणदनू लागतात. पण हल्ली बेरोजगार युवकांचे दोनाचे चार हात होतच नाहीत. गेल्या काही वर्षात मुलांचा जन्म दर घटल्याने मुलींपेक्षा मुलांची संख्या वाढली आहे. त्यातच अनेक मुली संगणक, शिलाईकाम, ब्युटी पार्लर असे कोर्स करून स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. तर काही मुली डॉक्टर, इंजिनिअर, वकील बनवून नोकरी करतात. त्यांनाही नोकरीवाला किंवा
व्यवसायवाला नवरा हवा असतो मात्र कोरोनामुळे सुशिक्षित तरुणही शिकून-सवरून बेरोजगार आहेत. त्यामुळे त्यांच्याशी लग्न करण्यासाठी कोणीही तयार नाही. ही परिस्थिती बघता अख्खी पिढी नवऱ्या मुलीची शोध घेताहेत. मुलांचे लग्न ठरेना म्हणून त्यांचे आई-वडीलही डोक्याला हात लावून बसले आहेत. त्यामुळे बेरोजगारीची पायातील बेडी कधी तुटणार अन लग्नाची जोडी कधी जमणार अशा प्रश्नाच्या चक्रातच तरुण अडकलेले दिसत आहेत.
मुलींच्या अपेक्षांचा वाढतोय डोंगर
मुलगा कसा असावा ही प्रत्येकाची आवडनिवड वेगवेगळे असते परंतु प्रत्येक मुलीला मुलगा सरकारी नोकरी वाला सर्विस वाला पाहिजे पगार पाणी व्यवस्थित पाहिजे याच अपेक्षांचा डोंगर हा दिवसेंदिवस वाढत चालल्याने बेरोजगारीच्या अडकलेल्या बेडीतील तरुणांची गळचेपी होत आहे तसेच शेतकरी नवरा आणि छोटे व्यवसाय तरुणांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
व्यवसाय दाराला पोरगी देणार काय?
कोरोनामुळे सर्वच उद्योगधंदे तसेच नोकर्या डबघाईला आल्या. लाखो तरुणाच्या हातातील रोजगार हा निसटून गेला. नोकरी गेली तर व्यवसाय करा वडापावचा गाडा काढा नाहीतर चाय चा स्टॉल लावा असे नानाविध कल्पना ह्या येतात परंतु खरंच व्यवसायिक दाराला मुलगी देणार काय? हा प्रश्न उद्भवत असल्याने नोकरीच्या शोधातच अनेक तरुण अजुनही गल्ली बोळे धुंडाळत आहेत.