नवादा
बिहार विधानसभा निवडणूक प्रचारात शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. बेरोजगारीच्या मुद्यावर बोट ठेवत 2 कोटी लोकांना रोजगार का मिळाला नाही? असा प्रश्न राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना विचारला आहे. लॉकडाऊनच्या काळात बिहारमधील कित्येक लोक विविध राज्यातून परतत असताना त्यांना त्यावेळी मोदी सरकारने मदत केली काय? असा प्रश्न राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना केला. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांनी हुतात्मा जवानांचा अपमान केल्याचा गंभीर आरोप केला. तसेच पंतप्रधान मोदी जेथे जातात तेथे खोटे बोलतात अशा शब्दात त्यांनी मोदींवर निशाणा साधला. चीनच्या सैनिकांच्या हल्ल्यात आपले 20 जवान हुतात्मा झाले. आपली 1200 किलोमीटर जमीनही चीनने हडपली, असाही आरोप त्यांनी केला.
तेजस्वी यादव यांचा नितीशकुमारांवर हल्लाबोल
राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी आपल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. नितीशुकमार गेली कित्येक वर्षे राज्याचे नेतृत्त्व करत आहेत. राज्यात डबल इंजिनचे सरकार असूनही विकासाचा गाडा हलताना दिसत नाही, असा आरोप त्यांनी केला. राज्यात बेरोजगारांनाही न्याय मिळत नसल्याचा दावा करत भ्रष्टाचार मोठय़ा प्रमाणात बोकाळल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला.