त्याचे अधिकारी होण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले….
वार्ताहर / प्रयाग चिखली
प्रशासनिक अधिकारी होण्याचे स्वप्न होते, तेवढी क्षमताही होती आणि अभ्यासही पूर्ण झाला होता. मात्र गेल्या सहा महिन्यात विविध स्पर्धा परीक्षा अनेक वेळा पुढे ढकलल्यामुळे प्रचंड नाराज झालेल्या करवीर तालुक्यातील पाडळी बुद्रुक येथील स्वप्निल भैरवनाथ दुधाने ( वय२७) या अभियंत्याने एक प्रकारे बेरोजगारीला कंटाळून औरंगाबाद येथे गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली
ही घटना औरंगाबाद येथे एका कंपनीत इंजिनिअर म्हणून काम करीत असलेला स्वप्नीलचा भाऊ संदीप दुधाने यांच्या घरी शुक्रवारी सायंकाळी सात वाजता उघडकीस आली. घटनास्थळी सुसाईट नोट पोलिसांना मिळाली दरम्यान बेरोजगारीला कंटाळूनच स्वप्नीलने हे कृत्य केले असावे असे मत त्यांच्या कुटुंबीयांकडून व्यक्त झाले.
याबाबतची अधिक माहिती अशी.पाडळी बुद्रुक येथील भैरवनाथ दुधाने यांना दोन मुलगे व एक मुलगी अशी तीन अपत्ये होती त्यांचे गावांमध्ये एक छोटेसे किराणा दुकान आहे. मुलांना अधिकारी बनविण्याच्या उद्देशाने त्यांनी मुलांना चांगले शिक्षण दिले तिघे मुले हुशार असल्याने दोन मुलगे संदीप व स्वप्नील (मयत) सांगलीच्या वालचंद कॉलेज मधून मेकॅनिकल इंजिनिअर बनली. तर मुलगी डी. वाय पाटील कॉलेज मधून कॉम्प्युटर इंजिनिअर झाली संदीप व स्वप्नील यांना कॉलेजमधूनच जॉब मिळाला संदीप औरंगाबाद येथील कंपनीत गेला तर स्वप्नील गुजरातमधील एका कंपनीत नोकरीस लागला परंतु त्याचे मन रमेना त्याला अधिकारी व्हायचे होते, म्हणून दोन वर्षानंतर नोकरी सोडून तो त्याचा भाऊ संदीप यांच्या घरी औरंगाबाद येथे दोन वर्षापासून राहत होता.
दरम्यान तो स्पर्धा परीक्षा अभ्यास करत होता स्वप्निल इयत्ता दहावी मध्ये 95 टक्के गुण संपादन करून कुडित्रे केंद्रात प्रथम आला होता. तो मुळातच हुशार होता त्याने पीएसआयची मुख्य परीक्षा दिली आहे. परंतु त्याला अधिकारी व्हायचं होतं म्हणून त्याने अभ्यास सुरू केला होता. मात्र एप्रिल 2020 पासून कोविडच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षांच्या वेळापत्रकात अनेक वेळा बदल झाला प्रत्येक वेळी अभ्यास पूर्ण झाला असताना देखील स्वप्नीलची संधी हुकली होती. त्यामुळे स्वप्नीलने चांगलेच मनाला लावून घेतले होते. अखेर या नाराजीतून त्याने भाऊ संदीप ड्युटीवर गेले असता घरामध्ये गळफास लावून घेतला. शुक्रवारी सायंकाळी भाऊ संदीप घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली दरम्यान सुसाईड नोट मध्ये नमूद केले प्रमाणे त्याचा मृतदेह गावाकडे न्यावा अशी इच्छा व्यक्त केल्यामुळे त्याच्यावर पाडळी बुद्रुक येथे अंत्यसंस्कार झाले. स्वप्निलच्या या अघोरी निर्णयामुळे संपूर्ण कुटुंब आणि गावही सुन्न झाले आहे. सध्या अनेक तरुण या परिस्थितीतून जात आहेत बेरोजगारीमुळे स्वप्निलचा घात नक्कीच विचार करावा लागणारा आहे.