प्रतिनिधी/ सातारा
एकीकडे कोरोनाचा कहर, व्यवसायातील मंदी अन रोजगार संधी नसल्याने घरी बसून असलेल्या युवकांच्या मनात कोलाहल सुरु आहे. त्यातूनच मग कामधंदा, नोकरी नसल्याने वडूथ, ता. सातारा येथील एका युवकाने राहत्या घरात अँगलला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. तर आसगाव, ता. सातारा येथेही एका युवकाने गरिबीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली. ही दोन्ही गाव काही अंतरावरच असून एकाच दिवशी काही फरकाने या घटना घडल्या आहेत. तर वाईमध्ये लग्न ठरत नाही, नोकरी लागत नसल्याने एका युवकाने आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घटना घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सागर भगवान कांबळे (वय 22) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तो वडूथ, ता. सातारा येथे आपल्या कुटुंबियांसमवेत रहात होता. लॉकडाऊनपासून नोकरी, रोजगारीवर चांगलाच परिणाम झालाय. त्याचा फटका ग्रामीण भागात अधिक बसलाय. सागर कांबळे देखील नोकरी, कामधंद्याच्या शोधात होता. मात्र, त्याला कोठेही नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे घरीच थांबून होता.
दि. 15 रोजी दुपारी 2 वाजता तो घरातच होता. बाकीचे कुटुंबिय बाहेर गेले होते. नोकरी, कामधंदा नसल्याच्या नैराश्यातून मग सागर कांबळे याने घरातील अँगलला नायलॉनच्या दोरीने गळफास घेवून स्वतःचे जीवन संपवले. ही घटना समोर आल्यावर कांबळे कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. घटनास्थळी सातारा तालुका पोलिसांनी पंचनामा केला असून शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास हवालदार जाधव करत आहेत.
आसगावच्या युवकाची आत्महत्या
दरम्यान, सातारा तालुक्यातील आसगाव येथील एका बावीस वर्षीय युवकाने गळफास घेवून आत्महत्या केली. आकाश बापू मोझर (वय 22, रा. आसगाव, ता. सातारा) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून ही घटना सोमवार, दि. 15 रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेने ऐन भरातील मुलगा सोडून गेल्या मोझर कुटुंबियांवर आकाश कोसळले आहे. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे. आकाश याने गरिबीला कंटाळून आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. याबाबतची खबर सदाशिव नारायण मोझर यांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला अधिक तपास पोलीस हवालदार तोरडमल करत आहेत.