मध्यप्रदेशच्या देवास जिल्हय़ातील नेमावर येथे नर्मदेच्या तटावर एका जैन मंदिराचे बांधकाम सुरू आहे. मात्र, हे मंदिर सिमेंट, वाळू, विटा अशा साधनांनी न बनता पुराणकालीन पद्धतीने अर्थात बेल, गूळ, चुना इत्यादी साधनांचा उपयोग करून बांधले जात आहे. मंदिराची निर्मिती जवळजवळ पूर्ण होत आली आहे.
1997 मध्ये आचार्य विद्यासागरजी महाराज यांच्या उपस्थितीत या मंदिराचा पाया घातला गेला होता. येथे त्रिकालचोबीसी, पंचबालयती आणि सहस्रकूट इत्यादी 26 मंदिरे यापूर्वीच निर्माण करण्यात आली आहेत. हा संपूर्ण परिसर 21 एकरचा असून यातील 17 एकर भूमी मंदिरांच्या बांधकामासाठी वापरली आहे. मंदिरांच्या बांधकामांसाठी राजस्थानातील बन्सीपूर येथील डोंगरातले गुलाबी, लाल दगड उपयोगात आले आहेत. पंचबालयती मंदिरात एक टन वजनाच्या तांब्याच्या मूर्ती स्थापन करण्यात आल्या आहेत. मात्र, मुख्य वैशिष्टय़ जिनालय (जैन मंदिर) हे असून त्याचा पाया 35 फूट खोल आहे. पाया भक्कम करण्यासाठी बिल्व वृक्षाची (बेलाचे झाड) लाकडे तसेच गूळ आणि चुना उपयोगात आणला गेला आहे. दगडांना एकमेकांना जोडण्याचे हे प्राचीन तंत्रज्ञान आहे. अशाप्रकारे बांधलेली मंदिरे शेकडो वर्षे टिकू शकतात. शिवाजी महाराजांनी स्वराज्यात गडकिल्ले उभारताना याच तंत्रज्ञानाचा उपयोग केला होता. या मंदिर संकुलात त्रिकालचोबीसी आणि जिनालय यांच्यासह बारा बारा मंदिरांच्या दोन रांगा आहेत. जैन धर्माच्या 24 तीर्थंकारांच्या स्मरणार्थ ही मंदिरे बांधली गेली आहेत. या तीर्थंकारांच्या भूत, भविष्य आणि वर्तमान अशा तीन स्वरुपातील 72 मूर्ती स्थापन करण्यात आल्या आहेत. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हे मंदिर संकुल पर्यटनाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.