तज्ञांमधून व्यक्त होतेय चिंता : सोशल डिस्टन्सचा फज्जा : रविवारीही खरेदीसाठी उडाली झुंबड
प्रतिनिधी /बेळगाव
खरोखरच क्लोजडाऊन म्हणजे काय? आणि लॉकडाऊन म्हणजे काय? याचा अभ्यास कुणालाच नसल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसाला हजारच्या घरात सापडत आहेत, ही बाब अत्यंत धोकादायक आहे. असे असताना खरेदीसाठी शहराच्या मुख्य बाजारपेठेत झुंबड उडाली आहे. ही खरोखरच एक मोठी शोकांतिका आहे. कारण सध्याचा काळ हा फक्त आणि फक्त आपला जीव सांभाळण्याचा आहे. जगलो तर काहीही खरेदी करू, पण बेळगावकरांना जणू खाल्लो तरच जगू. असे वाटत असल्याचे दिसून येत आहे. आपल्या घरात असलेल्या जीवनावश्यक वस्तूतून आपण सहज 15 दिवस जगू शकतो, अशी परिस्थिती असूनदेखील जणू आता दुष्काळच पडणार आहे, अशा भीतीपोटी जी खरेदी सुरू आहे तीच बेळगावकरांच्या जीवाशी खेळणारी असल्याचे दिसून येत आहे.
सरकारने क्लोजडाऊन केले तरीदेखील नियम पाळून खरेदी करण्याची मुभा देण्यात आली. तसेच नियम काय आहेत, हे वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र नियमांचे उल्लंघन होत आहे. सकाळी 6 ते दुपारी 12 पर्यंत खरेदी करण्याची मुभा देण्यात आली. बेळगावचा विस्तार वाढला आहे, केवळ मुख्य बाजारपेठच नाही तर अनेक भागांमध्ये लहान बाजारपेठा आहेत.
असे असताना जाणूनबुजून बेळगावातच खरेदीसाठी येणे हे कितपत योग्य, याचे चिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
किती साठा करायचा?
सोमवार दि. 10 पासून 14 दिवसांचे कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. 14 दिवस म्हणजे जणू आपणाला वर्षभर काही मिळणारच नाही, अशा आविर्भात खरेदीसाठी नागरिक बाहेर पडले. 14 दिवसांसाठी आपणाला किती वस्तू पाहिजेत आणि किती साठा करायचा? याची थोडीशीही जाण बेळगावकरांना नसल्याचे दिसून आले. खरेदीसाठी आल्यानंतर प्रत्येकजण किमान 1 महिन्याचा तरी साठा करू शकतो. मात्र, लहान-सहान गोष्टींसाठी पुन्हा बाजारपेठेत येणे हे कितपत योग्य आहे, खरोखरच सध्याच्या परिस्थितीत तरी बेळगावकरांचे भानच हरपल्याचे दिसून येत आहे.
पूर्वी दुर्गम भागातील अनेक खेडय़ांचा शहराशी असलेला संपर्क पावसाळय़ात तुटत होता. सलग सहा महिने त्यांचा शहराशी संपर्क होत नव्हता. आताही खानापूर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क सहा-सहा महिने तुटतो. त्यासाठी पावसाळय़ापूर्वी दुर्गम भागातील नागरिक जीवनावश्यक वस्तूंची तरतूद करून ठेवतात. सध्या तसे करतही आहेत. मात्र, आता शहरातीलच आणि शहराला लागून असलेल्या गावांमधीलच नागरिक केवळ 14 दिवसांच्या खरेदीसाठी बाहेर पडत आहेत, ही बाब खरोखरच दुर्दैवी म्हणावी लागेल.
दुकानांसमोर लांबच लांब रांगा
लॉकडाऊन होणार म्हणून सकाळपासूनच दुकानांसमोर लांबच लांब रांगा काही दुकानांमध्ये तर खरेदी करण्यासाठी एकमेकांच्या अंगावर पडण्याचे प्रकारही घडत होते. अनेक दुकानदारांनी ही गर्दी पाहून कपाळाला हात मारून घेतला. जणू आम्हाला वर्षभर काही मिळणार नाही, असाच प्रकार सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे. अनेक ठिकाणी दुष्काळ पडतो, अनेक जण उपाशी राहतात. परिस्थिती आल्यानंतर प्रत्येकाला त्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. आहे त्यामध्ये समाधान मानून जीवन जगणे कधीही चांगले. मात्र, केवळ बडेजाव करणे आणि जीभेचे चोचले पुरविण्यासाठी आपला जीवच धोक्यात घालणे हे खरोखरच धोकादायक आहे. प्रत्येकाने स्वतःपासून याची सुरुवात केली पाहिजे की, काहीही असू दे आम्ही 14 दिवस आहे त्यामध्ये जीवन जगूया. दुसऱयांना असा उपदेश करून चालणार नाही तर स्वतःच त्याची सुरुवात केली पाहिजे, तेव्हाच कुठेतरी स्वतःचा आणि इतरांचाही जीव वाचवू शकतो.
आत्मचिंतन करण्याची वेळ
प्रत्येकाने आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. कारण कोरोनामुळे अनेकजण मृत्युमुखी पडत आहेत. कोरोनामुळे अनेकांना आर्थिक फटका बसत आहे. काहींचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. याचे कुठे तरी भान प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे.