आयात शुल्क कमी केल्याने कच्च्या मालाचे दर होणार कमी : छोटय़ा फौंड्रीचालकांना लाभ
प्रतिनिधी / बेळगाव
नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये तांबे, स्टील यासह अन्य धातूंवरील आयात शुल्क कमी करण्यात आले आहे. 15 वर्षांपूर्वीच्या वाहनांच्या स्क्रॅपिंग पॉलिसीबाबत तरतुदी करण्यात आल्या आहेत. यामुळे बेळगावमध्ये मोठय़ा प्रमाणात असलेल्या फौंड्री उद्योगाला मदत होणार आहे. यामुळे मागील काही दिवसांपासून स्टीलच्या वाढत्या दरामुळे डबघाईला आलेल्या फौंड्री उद्योगाला या तरतुदींमुळे नवी उभारी मिळणार आहे.
लॉकडाऊनमध्ये काही महिने उद्योग बंद होते. त्यानंतर हळूहळू ते सुरू करण्यात आले. काही प्रमाणात उद्योग चालू असतानाच अचानक स्टीलचे दर वाढले. ही दरवाढ झाल्यामुळे कच्चा माल महागला. यामुळे कच्चा माल व उत्पादनाची किंमत यामध्ये मोठी तफावत पडू लागली. ही तफावत भरून काढणे कठीण असल्यामुळे अनेक उद्योग बंद करण्याची वेळ फौंड्री व्यावसायिकांवर आली होती. बेळगावसोबतच कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातील फौंड्री व्यावसायिकांची अडचण झाली होती. यामुळे कच्च्या मालाचे दर कमी करण्याची मागणी केली जात होती.
सोमवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी स्टील, तांबे यासह इतर धातूच्या आयातीवरील शुल्क कमी करण्याची तरतूद अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केली. यामुळे फौंड्रीला कच्चा माल लागणाऱया स्टीलचे दर कमी होण्यास मदत मिळणार आहे. बेळगावमधील लहान फौंड्री चालकांना उपयोग होणार आहे.
स्क्रॅप पॉलिसीमुळे सुटय़ा भागांची मागणी वाढणार
15 वर्षांवरील जुनी वाहने स्क्रॅप करण्याबाबत तरतुदी करण्यात आल्या आहेत. यामुळे अनेक जुनी वाहने स्क्रॅपमध्ये घालावी लागणार आहेत. यामुळे नव्या वाहनांची मोठय़ा प्रमाणात मागणी निर्माण होऊ शकते. बेळगावमध्ये वाहनांचे सुटे भाग तयार केले जात असल्याने बेळगावच्या व्यवसायाला उभारी मिळू शकते. यामुळे कोरोना व त्या आधीच्या आर्थिक मंदीतून बाहेर पडण्यासाठी उद्योगांना ही एक सुवर्णसंधी ठरणार असल्याचा अंदाज केला जात आहे.
अंमलबजावणीची गरज
सरकारने स्टील तसेच इतर धातूंवरील आयात शुल्क कमी केल्यामुळे त्याचा बेळगावच्या उद्योगाला नक्कीच फायदा होईल. मध्यंतरी स्टीलचे दर भरमसाट वाढल्याने फौंड्री उद्योग बंद करण्याची वेळ आली होती. परंतु या निर्णयाने पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण पसरले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी त्वरित होणे गरजेचे आहे. लहान उद्योजकांनाही कंपनीने निर्धारित केलेल्या दरानेच कच्चा माल मिळाला तरच हा उद्योग टिकणार असल्याचे उद्योजक महादेव चौगुले यांनी सांगितले.