अन्न सुरक्षा विभागाचे दुर्लक्ष : अनेक ठिकाणी बासमतीमध्ये इतर तांदूळही करतायेत मिक्स
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावचा कुंदा जसा प्रसिध्द आहे. तसाच येथील बासमती सर्वत्रच प्रसिद्ध आहे. बेळगावच्या बासमतीला एक वेगळीच चव आहे. यामुळे साहजिकच बेळगावचा बासमती खाण्याकडे कल वाढलेला दिसतो. मात्र, आता बेळगावच्या बासमतीत भेसळीचा सुगंध दरवळू लागला आहे. यामुळे या बासमतीला धोक्याची घंटा वाजू लागली आहे. अनेक ठिकाणी भेसळयुक्त बासमती विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे याकडे अन्न सुरक्षा विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
बाजारपेठेत, शहरातील रस्त्यावर बऱयाच ठिकाणी बेळगावचा बासमती म्हणून रस्त्याशेजारी बसून विक्री केला जात आहे. तालुक्यातील एखाद्या गावाचे नाव घ्यायचे आणि तो तांदूळ विक्री करायचा असा प्रकार सुरू आहे. विक्री करण्यात येणारा तांदूळ इंटान, इंद्रायणी किंवा इतर काही यापेक्षाही हलक्या जातीचा तांदूळ विक्री केला जात आहे. काही शेतकरी संकरीत बियाणे वापरून नवीन जातीच्या तांदळाचे उत्पादन घेत आहेत. तो तांदूळही बासमती म्हणूनच विक्री केला जाऊ लागला आहे. यात अनेक ग्राहक आता बळी पडू लागले आहेत. काही व्यापारी लोकांनीही बासमतीमध्ये इतर जातीचे भात मिश्रीत केल्यामुळे त्याचा दर गडगडला आहे. याचा फटका थेट शेतकऱयांनाच बसू लागल्याचे दिसून येत आहे.
तांदळावर सेंट मारून विक्री
महत्त्वाचे म्हणजे विक्री करणाऱयांमध्ये शेतकरी नसतात तर राईस मिलमधून एखादे तांदळाचे पोते खरेदी करणे व ते विक्री करण्यासाठी बाजारात आणणे असे प्रकार सुरू आहेत. यामुळे खऱया बासमतीला त्याचा फटका बसू लागला आहे. ग्राहक बासमती म्हणून तांदूळ खरेदी करतो, त्यानंतर तो शिजविल्यानंतर अर्धवट शिजतो किंवा अती शिजल्यानंतर तो चिकट होतो. यामुळे बासमती तांदूळ चांगला नाही, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तेव्हा ग्राहकांनीही तांदूळ घेताना खरोखर बासमती आहे का? याचा अभ्यास करावा. सध्या विक्री करत असलेल्या तांदळावर सेंट मारून विक्री केली जात आहे. यामुळे वास चांगला येतो. मात्र तांदूळ खराब राहतो.
स्टीमरचा तांदूळ खाणे आरोग्याला धोकादायक तरीपण….
बासमती तांदळाचे उत्पादन इतर तांदळाच्या तुलनेत फारच कमी आहे. यामुळे बासमती तांदळाला दरही अधिक मिळतो. काही भागातील शेतकरी बासमतीचे उत्पादन चांगल्या प्रकारे घेत आहेत. मात्र, काही भात व्यावसायिक या बासमतीमध्ये इंद्रायणी, इंटान किंवा चक्क लांब असलेला रेशनमधील तांदूळही भेसळ करून विक्री करत आहेत. याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांबरोबर शेतकऱयांनाही बसू लागला आहे. सध्या राईस मिलमध्ये प्रत्येक तांदूळ पॉलीश करताना ‘स्टीमरचा’ उपयोग करू लागले आहेत. यामुळे तो तांदूळ इतर जातीचा आहे हे कोणालाच समजत नाही. वास्तविक स्टीमरचा तांदूळ खाणे आरोग्याला धोकादायक आहे. मात्र ग्राहकही नेहमीच पांढरा शुभ्र आणि चकाकणारा तांदूळच चांगला आहे म्हणून खरेदी करत आहेत, हे पूर्ण चुकीचे आहे.
व्यावसायिकांनी केलेल्या चुकीचा फटका शेतकऱयांना
बेळगाव परिसरात उत्तम प्रतीच्या बासमतीचे उत्पादन निघत आहे. मात्र केवळ भेसळमुळे या बासमतीचा दर्जा कमी होऊ लागला आहे. या बासमतीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मोठी मागणी होती. यामुळे सरकारने खरेदी करून हा तांदूळ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठविला होता. मात्र व्यापाऱयांनी हातचलाखी करून त्यामध्ये इतर जातीचा तांदूळ भेसळ केला होता. त्यामुळे तो संपूर्ण तांदूळ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून भारतात परत पाठविण्यात आला होता. वास्तविक यामध्ये जर भेसळपणा नसता तर आज बासमतीचा दर हा सध्या असलेल्या दराच्या दुप्पट झाला असता. पण केवळ व्यावसायिकांनी केलेल्या चुकीचा फटका शेतकऱयांना बसला आहे.
भेसळ करणाऱयांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी
या भेसळ प्रकरणाबाबत अन्न सुरक्षा विभागाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे बनले आहे. कारण भेसळ करणे हा गुन्हा आहे. तेंव्हा ज्या ठिकाणी बासमतीमध्ये भेसळ होत आहे. त्या ठिकाणी धाडी टाकून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱयांतून होत आहे. आता पुन्हा अशा प्रकारे बासमती म्हणून तांदूळ विक्री केला जाऊ लागला आहे. हा तांदूळ इतर जिल्हय़ांतील जनतेबरोबर गोवा, महाराष्ट्र राज्यातील जनताही खरेदी करू लागली आहे. याबाबत त्यांना अधिक ज्ञान नसल्याने ते विक्रेत्यांच्या बोलण्याला अलगद फसत आहेत. तेव्हा आता अशा प्रकारे भेसळ करून विक्री करणाऱया बैठय़ा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.