खडतर मेहनत घेतली तर कोणतेही यश मिळवता येते, हे बेळगावच्या रती हुलजी हिने दाखवून दिले आहे. नुकत्याच झालेल्या फेमिना मिस इंडिया या स्पर्धेमध्ये रतीने मोठे यश मिळविले आहे. मिस इंडियाच्या पहिल्या पाच स्पर्धकांमध्ये तिची निवड झाली होती. मिस इंडियाचा किताब जरी तिला मिळाला नसला तरी तिने मिळवलेले यश बेळगावच्या नागरिकांना प्रेरणा देणारे आहे. मॉडेलिंग क्षेत्रात इथपर्यंत पोहोचणारी ती बेळगावमधील पहिलीच मुलगी ठरली आहे. मूळची बेळगावची असणारी रती सध्या मुंबई येथे मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत आहे. आजवर तिने अनेक ऍड फिल्ममधून काम केले आहे. मासमीडियाचे शिक्षण घेतल्यानंतर पूर्णवेळ मॉडेलिंग करण्याचा विचार तिने केला. मिस कर्नाटका हा किताब पटकावल्यानंतर तिची मिस इंडियासाठी निवड झाली होती.
शेकडो स्पर्धांमधून तिने या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. या स्पर्धेसाठी सर्व स्पर्धकांना प्रशिक्षणही देण्यात आले होते. नुकतीच मुंबई येथे या स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. अंतिम फेरीतील पाच स्पर्धकांमध्ये तिची निवड झाली होती. काही गुणांमुळे मिस इंडिया होण्याची तिची संधी हुकली असली तरी पुढील वेळेला यापेक्षा अधिक मेहनत घेऊन या स्पर्धेत उतरण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे. रती ही गणेशपूर येथील शरद काचोजी-हुलजी व टिळकवाडी येथील सीमा उमेश भटकळ यांची कन्या आहे. या यशामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.