प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावसारख्या सुसंस्कृत शहरात नाईट लाईफ वाढत आहे. महाविद्यालयीन तरुण-तरुणी नाईट क्लब व पबमुळे व्यसनाच्या आहारी जात आहेत. क्लब व पब यांची संख्या मागील काही दिवसात वाढली असून, यामध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश अधिक आहे. त्यामुळे अशा पब व नाईट क्लबवर निर्बंध घालावेत, अशी मागणी नगरसेवक डॉ. शंकर पाटील यांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली.
अनधिकृत पद्धतीने शहरात पब व नाईट क्लब चालविले जात आहेत. या क्लबमध्ये नशेच्या आहारी जाऊन तरुणाई बेधुंद होत आहेत. रात्रभर हा धिंगाणा सुरू असतो. कपल्स व तरुणींसाठी मोफत एन्ट्री व अल्कोहोल देण्याची प्रलोभने दाखवली जात आहेत. इतर सर्व हॉटेल रात्री अकरा वाजता बंद होत असताना पब मात्र रात्रभर कसा सुरू राहतो? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
शहरातील सर्व नाईट क्लब व पब 11 वाजता बंद झालेच पाहिजेत. कोणालाही मोफत एन्ट्री देऊ नये, मोफत मद्य देऊ नये, अविवाहित तरुण-तरुणींना ओळखपत्रांशिवाय हॉटेलमधील रुम्स देणे बंद करणे गरजेचे आहे, अल्पवयीन तरुण-तरुणींना पब व क्लबमध्ये प्रवेश देऊ नये, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांच्याकडे निवेदन देण्यात आले. निवेदनाची एक प्रत मनपा आयुक्त व पोलीस आयुक्तांनाही पाठविण्यात आली आहे.
प्रशासनाला दिला अल्टिमेटम
पब व नाईट क्लबमुळे शहराची प्रतिमा मलीन होत आहे. तसेच तरुणाईही चुकीच्या वळणावर जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने यावर कठोर निर्बंध घालणे गरजेचे आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास त्यानंतर आपण आपली भूमिका जाहीर करू, असा अल्टिमेटमच शंकर पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे. यावेळी विनायक पुजारी, विनायक गुडशी, प्रसाद पाटील यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.