अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी
कोल्हापूर / प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महराज यांच्या पुतळ्य़ाच्या अवमानप्रकरणी निषेध करणाऱ्या बेळगावमधील 38 मराठी शिवभक्त तरुणांवर कर्नाटक शासनाने राजद्रोहाची गुन्हे दाखल केले आहेत. ही बाब शिवभक्तांच्या भावनांना ठेच पोहचविणारी आहे. गेले महिनाभर हे तरुण कारागृहात खितपत पडले आहे. त्यांच्यावरील खटले मागे घेऊन, त्यांना न्याय मिळवून द्या, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.
राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. तसेच सिमाभागातील मराठी बांधवांच्या भावनाही मांडल्या. यावेळी झालेल्या चर्चेत वसंत मुळीक यांनी कर्नाटक राज्यात भाजपचे सरकार असून या गंभीर प्रकरणात आपण लक्ष घालून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराव बोम्मई यांच्याशी संपर्क साधावा व राजद्रोहाचा गुन्हामागे घेण्याविषयी गांभीर्याने प्रयत्न करावेत, अशी मागणी केली. यावेळी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, प्रकाश पाटील, प्रताप नाईक, युवा आघाडीचे अध्यक्ष अवधुत पाटील आदी उपस्थित होते.
बेळगावमधील 38 मराठी शिवभक्त तरुणांवरील राजद्रोहाचा गुन्हा मागे घेण्यासाठी आपण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना तातडीने पत्र पाठवून आपल्या भावना कळवू. तसेच प्रत्यक्ष फोनवरून संपर्क करून प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.