औषध नियंत्रकांच्या देखरेखीखाली वाटप, सरकारी दवाखान्यात साठा उपलब्ध
प्रतिनिधी / बेळगाव
देशभरात रेमडेसिवीर इंजेक्शनची टंचाई निर्माण झाली आहे. बेळगावातही या इंजेक्शनसाठी कोरोनाबाधितांची धावपळ सुरू आहे. परजिल्हय़ातून व परराज्यातूनही इंजेक्शनसाठी बेळगावात चौकशी होत आहे. गेल्या तीन दिवसात परिस्थिती सुधारत असून रेमडेसिवीरच्या 1300 बाटल्या बेळगाव जिल्हय़ासाठी आल्या आहेत.
सरकारी व खासगी प्रणालीतून रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप सुरू आहे. बिम्ससह तालुका इस्पितळात थोडाफार साठा असून काळाबाजार रोखण्यासाठी खुल्या बाजारात वितरण बंद करण्यात आले आहे. सध्या औषध नियंत्रकांच्या देखरेखीखाली रेमडेसिवीरचे वाटप केले जात आहे. कोरोनाबाधितांना वाचविण्यासाठी जिथे जिथे आवश्यक आहे तेथे पुरवठा करण्यात येत असल्याचे असिस्टंट ड्रग कंट्रोलर रघुराम एन. व्ही. यांनी सांगितले.
बेळगावात रेमडेसिवीर इंजेक्शनची काय परिस्थिती आहे? त्याची उपलब्धता किती आहे? कोरोनाबाधितांना मुबलक पुरवठा सुरू आहे का? याची उत्तरे मिळविण्यासाठी ‘तरुण भारत’ने रघुराम यांच्याशी संपर्क साधला असता बेंगळूर व हैद्राबाद येथून बेळगावला पुरवठा सुरू झाला आहे. गेल्या तीन दिवसात 1300 बाटल्या बेळगाव जिल्हय़ाला आल्या आहेत. कार पाठवून आपण ही लस बेळगावला मागविल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हय़ात 28 इस्पितळांना रेमडेसिवीरची आवश्यकता आहे. यामध्ये कोविड व नॉनकोविड रुग्णांवर उपचार करणाऱया इस्पितळांनाही इंजेक्शन पुरवावे लागते. रुग्णाची परिस्थिती लक्षात घेऊन हे इंजेक्शन द्यायचे की नाही? याचा निर्णय डॉक्टर घेतात. तशी मागणी आपल्याला कळवितात. त्याची खात्री करून घेऊन त्यांना प्राधान्यक्रमाने लस वितरित केली जात आहे, असे रघुराम यांनी सांगितले.
अथणी येथील चार इस्पितळांनी रेमिडिसिविर इंजेक्शनसाठी मागणी नोंदविली होती. सध्या दोन इस्पितळांना पुरवठा करण्यात आला आहे. आपापसात चर्चा करून गरज लक्षात घेऊन देवाणघेवाण करण्याची सूचनाही संबंधितांना देण्यात आली आहे. देशपातळीवर तुटवडा निर्माण झाल्यामुळे ही परिस्थिती आहे. हळूहळू परिस्थितीत सुधारणा होत आहे, असेही त्यांनी सांगितले.
अनेक प्रकरणात रेमिडिसिविर इंजेक्शन घेतले तरच आपण बरे होतो, असे रुग्णांच्या डोक्मयात असते. मात्र, याचा निर्णय बाधितांनी घेऊ नये. ते डॉक्टर ठरवितात. ज्यांना जीव वाचविण्यासाठी अत्यंत गरज आहे, त्यांना खासगी किंवा सरकारी प्रणालीतून इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एकंदर वितरण प्रणालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही रघुराम यांनी केले आहे.