प्रतिनिधी / बेळगाव :
लॉकडाऊनमुळे बेळगाव शहरात अनेक परप्रांतीय नागरिक व कामगार अडकून पडले होते. महापालिकेच्यावतीने विविध ठिकाणी त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अखेर रेल्वे सुरू झाल्याने गुरुवारी हुबळीमार्गे 332 परप्रांतीय राजस्थानी नागरिकांना स्वगृही पाठविण्यात आले.
अचानक लॉकडाऊन घोषित झाल्याने अनेक परप्रांतीय कामगार बेळगावसह राज्यात अडकून पडले होते. काही कामगार बेंगळूरहून विविध वाहनांद्वारे राजस्थान व अन्य ठिकाणी चालले होते. मात्र, कोगनोळी व विविध चेकपोस्टवर वाहनांची तपासणी करून परप्रांतीयांना अडवून ठेवण्यात आले होते. त्यांची आरोग्य तपासणी करून समाज कल्याण खात्याच्या वसतिगृहात तसेच वंटमुरी येथील मोरारजी देसाई वसतिगृहात ठेवण्यात आले होते. परप्रांतीय नागरिकांना घरी पोहोचविण्यासाठी राज्यशासनाने ऑनलाईन नोंदणी करून घेतली होती. त्यानुसार असंख्य नागरिकांनी आपली नावे नोंदविली होती. विविध माध्यमांद्वारे स्वगृही जाणाऱया परप्रांतीयांना अडवून ठेवण्यात आले होते. अशा 332 परप्रांतीयांना पाठविण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न चालविले होते. बुधवारपासून रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली आहे. पण बेळगाव रेल्वे स्थानकावर थांबा नसल्याने हुबळीमार्गे पाठविण्यात आले. बसने परप्रांतीय नागरिकांना हुबळी रेल्वे स्थानकावर सोडण्यात आले. त्या ठिकाणी त्यांची आरोग्य तपासणी करून महानगरपालिकेच्यावतीने नाष्टय़ाची व्यवस्था करण्यात आली. तेथून रेल्वेतून राजस्थान व अन्य ठिकाणी जाण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून अडकलेले परप्रांतीय स्वगृही गेले.