शनिवारी रात्रीपासूनच अंमलबजावणी
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महामारी थोपविण्यासाठी राज्य सरकारने दर रविवारी संपूर्ण राज्यात लॉकडाऊन जारी केला आहे. गेल्या रविवारी नागरिकांनी स्वयंप्रेरणेने आपले व्यवहार बंद करुन लॉकडाऊन पाळले होते. शनिवारी रात्रीपासून लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे.
पोलिसांनी प्रमुख मार्गावर बॅरिकेड्स उभे करुन मार्ग बंद करण्यास सुरू केले आहे. रविवारी दूध, औषधे आदी जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद असणार आहेत. यासंबंधी गेल्या शनिवारी जिल्हाधिकाऱयांनी एक आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार या महिन्यात रविवारी कडक लॉकडाऊन असणार आहे.
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन बेंगळूर शहर व जिल्हय़ात मंगळवारपासून आठ दिवस लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. उपलब्ध माहितीनुसार संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा निर्णय घ्यायचा का? याचा विचार सुरू आहे. सोमवारी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा सर्व जिल्हाधिकाऱयांबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहेत. या बैठकीनंतरच राज्यातील आणखी कोणकोणत्या जिल्हय़ात कोरोनाचा धोका अधिक आहे. कोणत्या जिल्हय़ात पुन्हा लॉकडाऊन जारी करावा लागणार याचा विचार होणार आहे. शनिवारी राज्यातील एकूण बाधितांची संख्या 2 हजार 800 च्या घरात आहे. त्यामुळे सरकारने गांभीर्याने पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
केवळ रविवारचे लॉकडाऊन करुन महामारी रोखता येणार नाही. त्यामुळे पुढील आठवडय़ात किमान शुक्रवारी रात्रीपासून सोमवारी पहाटेपर्यंत संपूर्ण राज्यात लॉकडाऊनसाठी सरकारवर जनतेचा दबाव वाढत चालला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात बेंगळूरात आठ दिवस लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. सोमवारी बेळगावसह राज्यातील कोणत्या जिल्हय़ात लॉकडाऊन होणार हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान धर्मवीर संभाजी चौक, राणी चन्नम्मा चौकसह प्रमुख मार्गावर नाकाबंदी करण्यात आली आहे. वाहनांची तपासणी करण्यात येत होती. राज्य राखीव दल व शहर सशस्त्र दलाच्या काही पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या काही गुन्हेगारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बॅरिकेड्स उभे करुन वाहने तपासणाऱया पोलिसांनीही खबरदारी घेतली आहे.