प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव येथील माणिकबाग दिगंबर जैन बोर्डिंग येथे आचार्य वर्धमान सागर जी महाराज यांचा यंदाचा ससंघ चातुर्मास संपन्न होत आहे. या दरम्यान दि. 20 जुलै रोजी दुपारी 3:30 वाजता मुनी श्री देवकांत सागरजी महाराज याना यमसल्लेखन पूर्वक समाधी मरण प्राप्त झाले. गेल्या 13 दिवसांपासून त्यांनी देव – शास्त्र – गुरु यांच्या साक्षीने , सिद्ध भक्ती, श्रुत भक्ती, समाधी भक्ती व गुरु वंदना करत सल्लेखना व्रत स्वीकारले होते. मूळचे राजस्थान येथील विनोता (जि. चित्तोडगढ) येथील उम्मेदमलजी जैन यांनी 2007 साली श्रवणबेळगोळ येथे क्षुल्लक दीक्षा तर 2010 साली आचार्य वर्धमान सागर जी महाराज यांच्याकडून मुनी दीक्षा घेतली होती. जैन धर्मात श्रावक व मुनी अशा दोघांनीही स्वयंप्रेरणेने सल्लेखना व्रत स्वीकारण्याची परंपरा अनेक शतकांपासून चालत आली आहे. हे व्रत स्वीकारल्यानंतर अन्न व पाण्याचे ग्रहण अनेक दिवसांच्या कालांतराने हळुहळू कमी करत शेवटी पूर्णपणे बंद केले जाते. आपण अर्जित केलेल्या कर्माचा सल्लेखना मरणाने याच जन्मी क्षय करून मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते. गेल्या वषी आचार्य वर्धमान सागर जी महाराज यांच्याच संघातील मुनी नमित सागरजी महाराज यांनी यरनाळ (ता. हुक्केरी) येथे तर गेल्या महिन्यात क्षपक मुनीराज श्री सहिष्णू सागर जी महाराज यांनी देखील यमसल्लेखना पूर्वक समाधी मरण स्वीकारले होते. दि. 20 जुलै 2020 या दिवशीच सकाळी 10:52 वाजता आर्यिका पूज्य 105 श्री श्रेयमाती माताजी यांना निर्विकल्प समाधी मरण प्राप्त झाले. मूळच्या नवलीया (राजस्थान) येथील पुष्पा भोपावत यांचा जन्म 1957 सालचा. त्यांनी 2016 साली आचार्य वर्धमान सागर जी महाराज यांच्याकडून दीक्षा घेतली होती. एकाच दिवशी दोन पुण्यात्मांचे समाधीमरण होण्याचे हे बेळगावातील पहिलेच उदाहरण आहे. अंतिम संस्कारासाठी बेळगाव येथील जैन बांधव उपस्थित होते.