प्रवाशांचाही प्रतिसाद : उत्पन्नात वाढ, प्रवाशांतून समाधान : महाराष्ट्राच्या लाल परीची अद्याप एन्ट्री नाही
प्रतिनिधी /बेळगाव
मागील काही महिन्यांपासून ठप्प झालेली बेळगाव-कोल्हापूर बससेवा पूर्वपदावर आली आहे. बेळगाव बसस्थानकातून कोल्हापूर येथे धावणाऱया बसची संख्या वाढली आहे. शिवाय प्रवाशांचा प्रतिसादही वाढत असल्याने परिवहनला समाधानकारक महसूल मिळत आहे.
बेळगाव बसस्थानकातून महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक आदी ठिकाणी बससेवा सुरू झाली आहे. मात्र सांगली आणि कोल्हापूर शहरात बस न जाता बाहेरून धावत होत्या. पण आता कर्नाटकच्या बस कोल्हापूर बसस्थानकाच्या बाहेर थांबत आहेत. त्यामुळे प्रवाशांची संख्यादेखील वाढत आहे. कोरोना, लॉकडाऊन आणि महाराष्ट्रातील कर्मचाऱयांचा संप यामुळे कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य बससेवा लांबणीवर पडली होती. अखेर कर्नाटक परिवहनने महाराष्ट्रात बससेवा सुरू केली आहे. मात्र अद्याप महाराष्ट्राच्या लालपरीने कर्नाटकात एन्ट्री केली नाही. पण येत्या काही दिवसांत लालपरीदेखील सुरळीत सुरू होईल, अशी अशा प्रवाशांना आहे.
बेळगाव, कोल्हापूर मार्गावर बसफेऱया वाढविण्यात आल्याने निपाणी, हत्तरगी, संकेश्वर असा प्रवास करणाऱया प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. याबरोबरच इतर ठिकाणीदेखील बससेवा सुरळीत सुरू झाल्याने प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला आहे. विशेषतः सीमाहद्दीवरील विद्यार्थीवर्गाला दिलासा मिळाला आहे. बससेवा बंद राहिल्याने विद्यार्थीवर्गाचे हाल झाले होते. मात्र आता बस नियमित झाल्याने बसपास असलेल्या विद्यार्थ्यांना सोयीस्कर झाले आहे.
कोरोनामुळे थांबलेल्या आंतरराज्य बससेवेमुळे दोन्ही राज्यांना फटका बसला. त्याबरोबरच नोकरदार, कामगार आणि विद्यार्थीवर्गाचे हाल झाले. मात्र हळूहळू बससेवा पूर्वपदावर येत असल्याने प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान आरटीपीसीआर अहवाल सक्ती मागे घेण्यात आल्याने आंतरराज्य वाहतूक सुसाट सुरू झाली आहे.