वार्ताहर/ रामनगर
बेळगाव-गोवा महामार्गावरील खानापूरपासून गोवा हद्दीपर्यंत स्थगिती असल्याने सदर मार्गाचे काम बंद स्थितीमध्येच आहे. तर स्थगिती निर्णयाबद्दल उच्च न्यायालयाकडून फक्त पुढील तारीखच मिळत असल्याने आता हा मार्ग होण्याची आशाच मावळली आहे.
उच्च न्यायालयाकडून अनेक तारखानंतर 29 ऑक्टोबरची तारीख देण्यात आली होती. यामुळे या दिवशी निर्णयाची आशा होती. परंतु पुन्हा 26 नोव्हेंबर रोजीची तारीख देण्यात आली आहे. यामुळे पुन्हा या मार्गावरील प्रवाशांना खड्डे व धुळीचा व पावसात चिखलाचा सामना करावा लागणार आहे. तक्रार क्रमांक एसपीएल (सी) नं. 008665-008667/2020 असून सदर नोंदणी 20 जुलै या दिवशी झाली आहे. तसेच निकाल लागेपर्यंत महामार्गावरील मोठ मोठे खड्डे बुजविण्याची अनेकवेळा मागणी करूनही राष्ट्रीय महामार्ग खात्याने याकडे दुर्लक्ष केले आहे.