साडे तीन हजार अहवालांची प्रतिक्षा : 4 संशयितांचा मृत्यू : 8 हजारांहून अधिक जण क्वारंटाईनमध्ये : बाधितांत 50 बेळगावातील
प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या 24 तासांत जिल्ह्य़ातील 148 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर बेळगाव, खानापूर व गोकाक येथील चार संशयितांचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून जिल्ह्य़ातील एकूण बाधितांची संख्या 1651 च्या घरात पोहोचली आहे.
148 पैकी 50 हून अधिक जण बेळगाव शहर व उपनगरातील आहेत. अथणी तालुक्मयातील 35, चिकोडी तालुक्यातील 15, बैलहोंगल, रायबाग, खानापूर, सौंदत्ती, गोकाक, हुक्केरी येथील बाधितांचा यामध्ये समावेश आहे. राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटीनमधील माहितीनुसार शुक्रवारी बाधितांचा आकडा 116 इतका आहे.
बेळगाव शहरातील सदाशिवनगर, शाहूनगर, जाधवनगर, शहापूर, महांतेशनगर, आझादनगर, पोलीस हेडक्वॉर्टर्स, खडेबाजार, विरभद्रनगर, अशोकनगर, शिवाजीनगर, जेएनएमसी कॅम्पस्, मारुतीनगर, बसव कॉलनी, हनुमाननगर, अजमनगर, वडगाव, उज्वलनगर, केशवनगर, पिरनवाडी, हिरेबागेवाडी, मजगाव, मच्छे येथील 53 हून अधिक जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
शुकवारचा अहवाल लक्षात घेता बेळगाव शहर व तालुक्यातील रुग्ण संख्या वाढती आहे. याबरोबरच मिरज येथील 4 व सांगली येथील 4 असे सांगली जिह्यातील एकूण 8 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अथणी तालुक्मयातून त्यांची स्वॅब तपासणी करण्यात आली होती. शुक्रवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.