इतिहासात पहिल्यांदाच 10 वी परीक्षेच्या निकालाचा उच्चांक : विद्यार्थी जोमात तर वेबसाईट कोमात : सर्व्हर डाऊनमुळे निकाल 4 तास उशिरा
प्रतिनिधी / बेळगाव
एसएसएलसीचा निकाल अखेर सोमवारी दुपारी जाहीर झाला. शिक्षणमंत्र्यांनी निकाल जरी जाहीर केला तरी वेबसाईटचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे तीन ते चार तासांनी विद्यार्थ्यांना निकाल पाहता आला. यावर्षी इतिहासात पहिल्यांदाच बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ाचा निकाल 100 टक्के लागला आहे. त्यामुळे विद्यार्थी जरी पास झाले असले तरी शिक्षण विभागाची वेबसाईट मात्र नापास झाली. यामुळे विद्यार्थी वर्गातून नाराजी व्यक्त होत होती.
कोरोनामुळे रखडलेली दहावीची परीक्षा 19 व 22 जुलै रोजी राज्यभरात पार पडली. यावषी प्रथमच बहुपर्यायी प्रश्नपत्रिका व स्पर्धा परीक्षांप्रमाणे ओएमआर उत्तर पत्रिकेचा समावेश करण्यात आला होता. कोरोनाच्या स्थितीतही विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांना धाकधूक होती ती निकालाची. निकाल केव्हा जाहीर होणार याबाबत निश्चिती नव्हती. अखेर सोमवार दि. 9 रोजी निकाल जाहीर होईल, असे सांगण्यात आल्याने विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे लक्ष निकालाकडे लागले होते.
पहिल्यांदाच 100 टक्के लागला निकाल
बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात 31 हजार 895 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेला बसलेले सर्वच विद्यार्थी पास झाल्याने बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ाचा निकाल 100 टक्के लागला आहे. यापैकी 16 हजार 562 विद्यार्थी तर 15 हजार 333 विद्यार्थिनी आहेत.
बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात 426 हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना ए ग्रेड तर 52 हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना बी ग्रेड मिळाला आहे. बेळगाव ग्रामीण 100 हायस्कूल, बैलहोंगल येथील 67, खानापूर 59, सौंदत्ती 67, व कित्तूरमधील 26 हायस्कूलचा समावेश आहे.
वेबसाईटचा सर्व्हर डाऊन
दहावी परीक्षा मंडळाने एकूण तीन वेबसाईटवरून निकाल जाहीर होईल अशी माहिती दिली होती. दुपारी 3.30 वा. निकाल जाहीर होईल असे सांगण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात 3.30 नंतर शिक्षणमंत्र्यांची बेंगळूर येथे पत्रकार परिषद झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला. तोवर विद्यार्थी व त्यांचे पालक वेबसाईटवर जावून निकाल पाहत होते. परंतु सर्व्हर डाऊन होते, तसेच बारावीचा निकाल येत होता. यामुळे विद्यार्थी संभ्रमात होते. दुपारी जरी निकाल जाहीर करण्यात आला असला तरी सायंकाळी उशीरापर्यंत निकालच इंटरनेटवर उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थी व पालकांमधून संताप व्यक्त होत होता.
बेळगाव शैक्षणिक जिल्हा एका दृष्टिक्षेपात
परीक्षेला अर्ज केलेले विद्यार्थी 31 हजार 895
एकूण निकाल 100 टक्के