2016 पासून 2020 या शैक्षणिक वर्षात प्रथमच बेळगाव जिल्हा निकालात पिछाडीवर
राधिका सांबरेकर / बेळगाव
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ाचा निकाल घसरला आहे. यामुळे 2019-2020 या शैक्षणिक वर्षात जिल्हय़ाने निकालात क श्रेणी मिळविली. परिणामी 2016 पासून 2020 या पाच वर्षांच्या कालावधीत बेळगाव जिल्हय़ाने प्रथमच निकालात शेवटून चौथा क्रमांक मिळविला आहे. कोरोनाचे संकट, बदललेली परीक्षा पद्धती यामुळे दहावी निकालात घसरण झाली असून जिल्हा 31 व्या स्थानावर आहे. राज्यात केवळ 4 जिल्हे क श्रेणीत असून त्यामध्ये बेळगावचा समावेश आहे. यामुळे शैक्षणिक सोयी-सुविधांच्या बाबतीत प्रगतिपथावर असलेल्या बेळगाव जिल्हय़ाने कोविड-19 च्या संकटामुळे निकालात पिछाडी घेतली असल्याचे अधोरेखित होत आहे.
बेळगाव जिल्हय़ाचा तालुकानिहाय निकाल विचारात घेता 2016 या शैक्षणिक वर्षात राज्यात 139 व्या स्थानावर असलेले बेळगाव शहर यंदा मात्र 180 व्या स्थानावर आहे. यावरून निकालाची टक्केवारी घसरत चालली असून जिल्हय़ाबरोबरच शैक्षणिक तालुकेदेखील निकालात पाठीमागच्या स्थानावर आहेत. 2019 या शैक्षणिक वर्षात बेळगाव तालुका राज्यात 35 व्या स्थानावर होता. यामुळे गतवर्षीचा निकाल समाधानकारक होता. मात्र यंदाच्या शैक्षणिक वर्षात बेळगाव तालुका 150 व्या स्थानावर आहे. यावरून निकालातील तफावत अधिक प्रकर्षाने जाणवत आहे.
जिल्हय़ाची टक्केवारी घसरली
बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ाचा गतवर्षीचा निकाल 77.43 टक्के लागला होता. यामुळे राज्यात बेळगाव जिल्हा 24 व्या स्थानी होता. मात्र यंदाची निकालातील घसरण श्रेणी पद्धतीनुसार 60 टक्क्यांपर्यंतच अडकली आहे. परिणामी तालुकानिहाय निकालात देखील प्रत्येक तालुका 100 च्या पुढच्या स्थानावर आहे. 2019-2020 या शैक्षणिक वर्षात खानापूर तालुका राज्यात 203 क्रमांकावर घसरला असून आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण आहे. तर इतर तालुकेदेखील दीडशतकाच्या स्थानातच आहेत. कोविड-19 चा धोका विचारात घेत लांबणीवर पडलेली दहावीची परीक्षा निकालात घसरण होण्यास जबाबदार ठरली असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
जिल्हय़ात बैलहोंगल टॉपवर
दहावी निकालात उत्तीर्णाच्या टक्केवारीत बैलहोंगल टॉपवर असून उत्तीर्णांचा आकडा 76.19 टक्के आहे. तर खानापूर 7 व्या क्रमांकावर असून 43.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बेळगाव शहर 56.68 टक्क्यांनी जिल्हय़ात पाचव्या स्थानावर आहे. तर बेळगाव ग्रामीण 66.64 टक्क्यांसह दुसऱया स्थानावर आहे. रामदुर्ग व सौंदत्ती तालुके अनुक्रमे तिसऱया व चौथ्या स्थानावर असून निकालाची टक्केवारी 62 ते 65 टक्क्यांच्या घरात आहे.