प्रतिनिधी/ बेंगळूर
यंदा देखील राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. यासंदर्भात राज्य सरकारने पूरग्रस्त तालुक्यांची यादी घोषित केली आहे. त्यामध्ये बेळगाव जिल्हय़ातील सर्व 14 तालुक्यांचा समावेश आहे. कृष्ण आणि तिच्या उपनद्यांना पूर आल्यामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून राज्य सरकारकडून या तालुक्यांसाठी लवकरच निधी घोषित होण्याची शक्यता आहे.
बेळगाव जिल्हय़ातील अथणी, बेळगाव, बैलहोंगल, चिकोडी, गोकाक, हुक्केरी, कागवाड, खानापूर, कित्तूर, मुडलगी, निपाणी, रायबाग, रामदूर्ग, सौंदत्ती या चौदा तालुक्यांना पूरग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहे. राज्य सरकारने घोषित केलेल्या यादीमध्ये उत्तर कर्नाटकातील अनेक तालुक्यांचा समावेश आहे. किनारपट्टी आणि मलनाड भागाही यंदा पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे या भागातील अनेक तालुक्यांना पूरग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहे.
ऑगस्ट महिन्यात पावसाने कहर माजविल्यामुळे पिकांसह पायाभूत सुविधांची मोठय़ा प्रमाणात हानी झाली होती. पूल, रस्ते, घरे, सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. याचा फटका 2 कोटीपेक्षा अधिक लोकांना बसला आहे. महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्यामुळे कृष्णा नदीला पूर आला. परिणामी नदीकाठावरील अनेक कुटुंबांचे स्थलांतर करावे लागले. त्यामुळे राज्य नैसर्गिक आपत्ती नियंत्रण केंद्राने दिलेल्या अहवालाच्या आधारे राज्य महसूल खात्याने 130 जिल्हय़ांतील 130 पूरग्रस्त तालुक्यांची घोषणा केली आहे. या तालुक्यांमध्ये एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या मार्गसूचीनुसार मदतकार्य हाती घ्यावे लागणार आहे.
कारवार जिल्हय़ातील अंकोला, भटकळ, कुमठा, कारवार, मुंडगोड, सुपा, शिरसी, होन्नावर, यल्लापूर आणि सिद्धापूर या तालुक्यांचा पुरग्रस्त यादीत समावेश आहे. तसेच बागलकोट जिल्हय़ातील बदामी, बागलकोट, बिळगी, गुळेदगुड्ड, हुनगुंद, इळकल, जमखंडी, मुधोळ, रबकवी-बनहट्टी तसेच विजापूर जिल्हय़ातील बाबलेश्वर, कोल्हार, मुद्देबिहाळ आणि निडगुंदी या चार तालुक्यांचा समावेश आहे.