राज्यभरात कुपोषणाचा दर दहा टक्के : सर्वेक्षण अहवालातून स्पष्ट
प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यभरात कुपोषित मुलांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. तसेच कुपोषणामुळे अनेक मुले मृत्यूच्या खाईत लोटली जात आहेत, असे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे. राज्यातील सुमारे 10 टक्के मुले कुपोषित असल्याचे उघडकीस आले आहे. बेळगाव जिल्हय़ात सर्वाधिक कुपोषित मुले असल्याचे सर्वेक्षण अहवालातून उघडकीस आले आहे. जिल्हय़ात 54,444 मुले मध्यम स्वरुपात तर 658 मुले तीव्र स्वरुपात कुपोषित आहेत.
कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे गेल्या दीड वर्षापासून अंगणवाडी शाळा बंद आहेत. तर दुसरीकडे आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांना कोरोना कामाला जुंपण्यात आले आहे. त्यामुळे कुपोषित मुलांचे सर्वेक्षण रखडले होते. दरम्यान, मे महिन्यात आरोग्य व कुटुंब कल्याण आणि महिला व बालकल्याण खात्याच्या अधिकाऱयांनी अंगणवाडी केंद्रात येणाऱया 6 वर्षाखालील 40 लाख 53 हजार 22 मुलांचे वजन आणि वाढीबाबत सर्वेक्षण केले आहे.
दरम्यान, बेळगाव जिल्हय़ात सर्वाधिक कुपोषित मुले असल्याचे अहवालातून उघडकीस आले आहे. त्यानंतर बळ्ळारी, रायचूर, कोप्पळ, विजापूर आणि यादगिरी जिल्हय़ांचा क्रमांक लागतो. याचबरोबर कोडगू जिल्हय़ात 3,356 मुले साधारण कुपोषित तर 37 मुले तीव्र स्वरुपात कुपोषित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यात एकूण 10 टक्के मुले कुपोषित असल्याचे आढळून आले आहे. सर्वेक्षण झाल्यानंतर 40,53,022 मुलांपैकी 10.50 टक्के मुले मध्यम स्वरुपात कुपोषित तर 0.19 टक्के मुले तीव्र स्वरुपात कुपोषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. 89.32 टक्के मुले सामान्य आहेत. मध्यम स्वरुपात कुपोषित असलेल्या 4 लाख 25 हजार 369 मुलांपैकी 1 लाख 92 हजार 377 मुले कल्याण-कर्नाटक, बिदर, गुलबर्गा, यादगिरी, रायचूर, कोप्पळ आणि बळ्ळारी जिल्हय़ातील आहेत. तर कमी वजन असलेल्या 7,627 मुलांपैकी 3,356 मुलेही याच भागातील आहेत.
राज्यभरात कुपोषित मुलांच्या संख्येत वेगाने वाढ होत असून अनेक मुलांचा मृत्यू झाल्याचेही अहवालातून दिसून येते. यासाठी राज्य सरकारने आवश्यक उपाययोजना राबविणे गरजेचे असून त्यादृष्टीने पावले टाकणे महत्त्वाचे आहे. तसेच कुपोषित मुलांचा शोध घेऊन त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कार्यवाही करणे गरजेचे आहे.