प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव कित्तूरमार्गे धारवाड या रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली होती. आता या रेल्वे मार्गासाठी जमिन हस्तांतरण करण्यासाठीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. बेळगाव व धारवाड जिल्हय़ातील एकूण 335 हेक्टर जमिन संपादित केली जाणार आहे. यासाठी नैऋत्य रेल्वेने प्रस्ताव तयार केला असून, लवकरच हा प्रस्ताव बेळगाव व धारवाड जिल्हा प्रशासनाला पाठविण्यात येणार आहे.
बेळगाव -धारवाड या नव्या रेल्वे मार्गासाठी अंदाजे 927 कोटी रूपये खर्च येणार आहे. 73 कि. मी. रेल्वे मार्गासाठी एकेरी रेल्वे मार्ग घालण्यात येणार आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाने निविदा देखील मागविल्या आहेत. जमिन हस्तांतरीत झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करण्यात येईल असे रेल्वे मंत्रालयाने म्हंटले आहे.
दिवंगत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी व केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या प्रयत्नातून या रेल्वे मार्गाला हिरवा कंदिल मिळाला होता. यापूर्वी बेळगाव – लोंढा मार्गे धारवाड असा 130 कि. मी. चा रेल्वे मार्ग होता. हा रेल्वे मार्ग जंगल भागातून जात असल्याने त्यावर मर्यादा येत होत्या. यासाठी अंदाजे 3 तासांचा कालावधी लागत होता. परंतु कित्तूर मार्गे होणाऱया नव्या रेल्वे मार्गामुळे तासाभरात बेळगाव-धारवाड असा रेल्वे प्रवास करता येणार आहे. तसेच 31 कि. मी. चे अंतर कमी होणार असल्याने वाहतुकीलाही चालणा मिळणार आहे.
ई विजया (मुख्य जन संपर्क अधिकारी, नैऋत्य रेल्वे)
बेळगाव-धारवाड या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाल्यानंतर आता जमिन हस्तांतरणाचा प्रस्ताव दोन्ही जिल्हा प्रशासनाला पाठविण्याची तयारी नैऋत्य रेल्वेतर्फे करण्यात आली आहे. लवकरच हा प्रस्ताव पाठविला जाणार असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.