‘तो’ मार्ग बदलण्याबाबत पाठपुरावा करण्याचे खासदारांनी दिले आश्वासन
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव-धारवाड हा रेल्वेमार्ग नंदिहळ्ळी, गर्लगुंजी परिसरातील सुपीक जमिनीतून करण्याचा प्रस्ताव रेल्वे विभागाने केला होता. मात्र, त्याला जोरदार विरोध करण्यात आला असून कोणत्याही परिस्थितीत सुपीक जमिनीतून हा रेल्वेमार्ग करू नये, अशी मागणी नंदिहळ्ळी परिसरातील शेतकऱयांनी केली आहे. याबाबत खासदार इराण्णा कडाडी यांच्याबरोबर बैठक घेऊन शेतकऱयांनी समस्या मांडल्या आहेत. त्यावर निश्चित विचार करून हा रेल्वेमार्ग इतर ठिकाणाहून केला जाईल, असे ठोस आश्वासन त्यांनी दिले आहे.
नंदिहळ्ळी, गर्लगुंजी, देसूर यासह इतर परिसरातील सुपीक जमिनीतून हा रस्ता करण्याचा घाट घालण्यात आला. याबाबत सर्व्हे करण्यात आला. नंदिहळ्ळी गावची जमीन ही अत्यंत सुपीक आणि उच्च प्रतिची आहे. बेळगाव तालुक्मयातील सर्वात जास्त सुपीक जमीन म्हणून नंदिहळ्ळी गावाकडेच पाहिले जाते. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करा आणि आम्हाला सहकार्य करा, अशी विनंती शेतकऱयांनी केली.
गर्लगुंजी परिसरातील शेतकऱयांनीही सुपीक जमिनीची माहिती दिली. त्यामुळे तो रेल्वेमार्ग माळवट जमिनीतून करावा, अशी विनंती करण्यात आली. यावेळी नंदिहळ्ळी ग्राम पंचायतीच्या अध्यक्षा निंगव्वा कुरबर, ग्रा. पं. उपाध्यक्ष नारायण पाटील, सदस्य सहदेव बेळगावकर, मल्लाप्पा लोकूर, रामदास जाधव, देवेंद्र पाटील, गर्लगुंजी ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष गोपाळ पाटील, तालुका पंचायत माजी सदस्य मारुती लोकूर यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.