खासदार मंगला अंगडी यांची रेल्वे अधिकाऱयांना सूचना : आढावा घेण्यासाठी नैर्त्रुत्य रेल्वेच्या अधिकाऱयांची बैठक : मार्गावर 13 स्थानकांची निर्मिती
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव, कित्तूर, धारवाड या नव्या रेल्वेमार्गाला केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली आहे. परंतु कोरोनामुळे या कामाला अद्याप गती आलेली नाही. या रेल्वेमार्गामुळे प्रवास कमी वेळेत होणार असल्याने भू-संपादनाची प्रक्रियाही लवकर पूर्ण करून या कामाला गती आणावी, अशी सूचना खासदार मंगला अंगडी यांनी नैर्त्रुत्य रेल्वेच्या अधिकाऱयांना दिली.
बेळगाव-धारवाड या रेल्वेमार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी खासदार अंगडी यांनी नैर्त्रुत्य रेल्वेच्या अधिकाऱयांची बैठक बोलाविली होती. या बैठकीला नैर्त्रुत्य रेल्वेचे उप मुख्य अभियंता चंद्रशेखर उपस्थित होते. राज्य सरकारने भू-संपादनाच्या प्रक्रियेला परवानगी दिली असल्याने आता लवकरच भू-संपादनाचे काम केले जाणार असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.
एकूण 97 कि. मी. च्या या रेल्वेमार्गासाठी 900 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा नवीन रेल्वेमार्ग कित्तूरमार्गे धारवाडला जोडला जाणार आहे. यातील 50 टक्के खर्च राज्य सरकार तर उर्वरित 50 टक्के खर्च केंद्र सरकार करणार आहे. दिवंगत केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नातून या मार्गाला अंतिम मंजुरी मिळाली होती. परंतु कोरोनामुळे भू-संपादनाची प्रक्रिया रखडली, अशी माहिती रेल्वे अधिकाऱयांनी बैठकी दरम्यान दिली.
एकूण 13 नवीन रेल्वेस्थानकांची निर्मिती केली जाणार आहे. हलगा, गनीकोप्प, तिगडी, संपगाव, बैलवाडी, बैलहोंगल, नेगिनहाळ, हुन्शीकट्टी, कित्तूर, तेगुरू, हेग्गेरी, मोमीनकट्टी, कऱयाकोप्प या रेल्वेस्थानकांचा समावेश केला जाणार आहे. या नव्या रेल्वेमार्गामुळे बेळगाव ते धारवाड अंतर 31 कि. मी. ने कमी होणार असून, रेल्वेची गती वाढविण्यास मदत होणार असल्याचे खासदार अंगडी यांनी सांगितले.