प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव-धारवाड या नव्या रेल्वेमार्गाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. बेळगाव कित्तूरमार्गे धारवाड अशा 73 कि. मी. च्या रेल्वेमार्गाला मंगळवारी सुवर्णसौध येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली. त्यामुळे भूसंपादनासाठी लागणारा खर्च राज्य सरकार उचलणार आहे. त्यामुळे लवकरच या मार्गाच्या कामाला सुरुवात होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
बेळगाव-धारवाड हा पूर्वीचा रस्ता लोंढामार्गे जात होता. या परिसरात जंगल परिसर असल्यामुळे रेल्वेची गती कमी होत होती. यासाठी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नातून बेळगाव-कित्तूरमार्गे धारवाड रेल्वेमार्गाला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली. या मार्गाला राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची परवानगी आवश्यक होती. अखेर सोमवारी या रेल्वेमार्गाला अंतिम मंजुरी मिळाली.
या रेल्वेमार्गासाठी 927.4 कोटी रुपये खर्च येणार आहे. कित्तूरसह 13 रेल्वे स्थानके तयार केली जाणार आहेत. या रेल्वेमार्गाच्या कामाची जबाबदारी राईट्स कंपनीकडे दिली होती. परंतु काही दिवसांपूर्वीच रेल्वे विभागाने ही कंपनी काम करणार नसल्याचे जाहीर केले. आता राज्य सरकारने मंजुरी दिल्याने भू-संपादनाचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे.