केंद्रिय रेल्वेराज्य मंत्री सुरेश अंगडी यांची पत्रकार परिषदेत माहिती
बेळगाव-धारवाड रेल्वे मार्गाच्या हालचाली गेल्या काही वर्षांपासून सुरु होत्या. आता त्याला केंद्र सरकारने हिरवा कंदिल दाखविल्याने प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. एकूण 73 कि.मी.चा रेल्वेमार्ग आहे. या रेल्वेमार्गासाठी 927 कोटी 40 लाख रुपये मंजूर झाले आहेत. आता या कामाला गती मिळणार असल्याची माहिती केंद्रिय रेल्वेराज्य मंत्री सुरेश अंगडी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
बेळगाव-देसूर, करविनकोप्प, बागेवाडी, एम. के. हुबळी, हुलीकट्टी, कित्तूर, तेगुरु, मम्मीगट्टी, कॅराकोप्प, धारवाड असा हा मार्ग होणार आहे. राज्य सरकार 50 टक्के खर्च करणार आहे तसेच केंद्र सरकार 50 टक्के खर्च करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
लोंढापासून धारवाडला जावे लागत होते. त्यामुळे बराच उशीर आणि हा प्रवास लांबचा होत होता. प्रवाशांच्या दृष्टिकोनातून धारवाड-बेळगाव हा मार्ग झाल्यास वेळही वाचणार आहे. जवळपास 3 तास वेळ वाचणार आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारनेही या मार्गाला मंजुरी दिल्याने तातडीने कामाला सुरुवात होईल. या रेल्वे मार्गासाठी शेतकरी जमिनी देखील देण्यास तयार आहेत, अशी माहिती देखील खासदार सुरेश अंगडी यांनी दिली आहे.
सध्या या रेल्वे मार्गाच्या सर्व्हेच्या कामाला सुरुवात झाली आहे. दोन वर्षात हे काम पूर्ण होईल. त्यानंतर या रेल्वेच्या मार्गाच्या कामाला सुरुवात होणार आहे. या रेल्वेमार्गामुळे बेळगाव बरोबरच कित्तूर औद्योगिक क्षेत्रालाही त्याचा फायदा होणार आहे. केंद्र सरकारने या रेल्वे मार्गाला परवानगी दिल्यामुळे केंद्रिय रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांनी केंद्र सरकारचे आभार व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील रेल्वेचा विस्तार वाढत चालला आहे. बेळगाव-धारवाड याचबरोबर इतर भागामध्ये रेल्वे जोड प्रकल्पासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे. आजपर्यंत केंद्र सरकारने सहकार्य केले आहे. यापुढेही सहकार्य करणार आहे. त्यामुळे निश्चितच बेळगावमधून इतर ठिकाणी आणखी रेल्वेमार्ग जोडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.