प्राथमिक सुविधांची वानवा : परिवहनचे दुर्लक्ष : प्रवाशांची गैरसोय : पार्किंगचा प्रश्नही गंभीर
प्रतिनिधी / बेळगाव
अनलॉकनंतर बससेवेला हळूहळू प्रवाशांचा प्रतिसाद वाढत असून बसस्थानकात प्रवाशांची वर्दळ वाढली तरी बसस्थानकात समस्यांचा डोंगर निर्माण झाला आहे. बसस्थानकात बसफेऱयांबरोबर प्रवाशांची संख्या पूर्वपदावर येत आहे. मात्र, येथे प्राथमिक सुविधांअभावी प्रवाशांचे हाल होत आहेत. बसस्थानकातून दररोज 624 हून अधिक बसगाडय़ा विविध मार्गांवर धावत आहेत. या माध्यमातून रोज 52 लाखांहून अधिक उत्पन्नही मिळत आहे. मात्र, बसस्थानक प्रवाशांना कोणत्याच सुविधा मिळत नसल्याने हाल होत आहेत.
मध्यवर्ती बसस्थानकातून दररोज स्थानिक बसेससह लांब पल्ल्याच्या शेकडो बसेस धावत असतात. महाराष्ट्र व गोवा राज्यांना लागून असलेल्या बसस्थानकात जिल्हय़ातील प्रवाशांबरोबर महाराष्ट्र व गोव्याच्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. मात्र, बसस्थानकात येणाऱया प्रवाशांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
बसस्थानक आवारातील रस्त्यांची दुर्दशा, पार्किंगचा अभाव, शौचालय, अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा अभाव, अपुरी आसन व्यवस्था या सुविधांची वानवा असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. या समस्यांकडे परिवहनच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बसस्थानक आवारात स्मार्ट बसस्थानकाचे काम सुरू आहे. त्यामुळे आवारात तात्पुरते बसस्थानक उभारून बससेवा पुरविली जात आहे. मात्र, या ठिकाणी कोणतीच सुविधा न पुरविल्याने अस्वच्छता निर्माण झाली आहे. बसस्थानकात शौचालयाची दुरवस्था झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. पुरुष-महिलांसाठी शौचालयांची उभारणी केली आहे. मात्र, कोणतीच सुविधा पुरविली नसल्याने अस्वच्छता निर्माण झाली आहे.
दुर्गंधीमुळे प्रवाशांना नाक मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. शौचालयाच्या आवारात झुडुपे वाढून अस्वच्छता निर्माण झाली आहे. बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली नाही. बसण्यासाठी आसन क्यवस्था नसल्याने काही प्रवाशांना उन्हातच बसच्या प्रतीक्षेत ताटकळावे लागत आहे. परिसरातील कचऱयाची उचल वेळेत होत नसल्याने कचऱयाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे.
स्मार्ट बसस्थानकाचे काम संथगतीने सुरू असल्याने बस पार्किंगचा प्रश्नही गंभीर बनला आहे. पदवी, पदव्युत्तर महाविद्यालयांबरोबर दहावी-बारावीचे वर्ग सुरू असल्यामुळे पासधारक विद्यार्थ्यांबरोबर प्रवाशांची संख्याही वाढली आहे. प्रवाशांना आपली वाहने रस्त्यावरच पार्क करावी लागत असल्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.