शेतकरी संघटनेची पत्रकार परिषदेत मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावात अधिवेशन भरवून सर्वसामान्य जनतेच्या पैशाचा चुराडा करण्यापेक्षा तेच पैसे पूरग्रस्त शेतकऱयांना तसेच कोरोनामध्ये दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना द्यावे, अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघाने केली आहे. कन्नड साहित्य भवन येथे पत्रकार परिषद घेवून ही मागणी करण्यात आली.
बेळगाव येथील सुवर्ण सौधमध्ये यापूर्वी अनेकवेळा अधिवेशन भरविले गेले. मात्र त्या अधिवेशनातून काहीच निष्पन्न झाले नाही. बेळगावचा आणि उत्तर कर्नाटकाचा विकास झालाच नाही तर येथे अधिवेशन भरवूनच काय उपयोग, असा प्रश्नदेखील करण्यात आला आहे. अधिवेशनासाठी कोटी रुपये खर्च केले जातात. सर्वसामान्य जनतेचेच हे पैसे आहेत. ते खर्च करण्यापेक्षा तेच पैसे पूरग्रस्तांच्या विकासासाठी वापरावेत, असे यावेळी चुन्नाप्पा पुजेरी यांनी आवाहन केले आहे.
कोरोनामुळे तसेच पावसाने झालेल्या नुकसानीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. जनतेकडे जगण्यासाठी काहीच शिल्लक नाही. असे असताना बेळगावात अधिवेशन घेऊन मंत्री, आमदार आणि अधिकारी यांच्यासाठी मोठी बडदास्त केली जाते. त्यांना सर्व व्हीआयपी जीवन जगण्यास मनमानीपणे खर्च केला जात आहे. या अधिवेशनामधून आतापर्यंत तरी काहीच उपयोग झाला नाही. तेंव्हा बेळगावात अधिवेशनच नकोच असे यावेळी सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेला संघटनेचे प्रकाश नाईक व पदाधिकारी उपस्थित होते.