प्रतिनिधी / बेळगाव :
कोरोना रुग्णांनी सिव्हिल हॉस्पिटल सध्या हाऊसफुल्ल झाले आहे. त्यामुळे प्रशासनासमोर रुग्णांना कोठे हलवायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी हालभांवी येथील मुरारजी देसाई वसती शाळेत हलविण्यात येत आहे. या इमारतीत 80 बाधितांवर उपचार करण्याची व्यवस्था आहे.
जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार एकूण बाधितांची संख्या 696 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 407 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. सध्या 272 जणांवर उपचार करण्यात येत आहे. आणखी 2 हजार 755 जणांचे अहवाल यायचे आहे. तर 6 हजार 811 जणांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.
बेळगावात खळबळ
उपलब्ध माहितीनुसार गेल्या 24 तासांमध्ये एका बेळगाव शहरातील तिघा जणांचा तर खानापूर येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कसई गल्ली येथील 65 वषीय वृद्धा, खासबाग (राघवेंद्र कॉलनी) येथील 58 वषीय रहिवासी, संभाजी रोड खासबाग येथील 58 वर्षीय महिलेचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या मंगळवारी बिम्समध्ये खानापूर येथील 45 वषीय रहिवाशाचा मृत्यू झाला होता. त्याचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे स्वॅब तपासणी अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. दरम्यान रामदुर्ग येथील 56 वषीय रहिवाशाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्हा हेल्थबुलेटिन माहितीनुसार कोरोनामुळे आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर प्रत्यक्षात हा आकडा 26 हून अधिक आहे.
सारीमुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. सारी रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्जिकल ब्लॉकमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.
याच विभागात आजवर सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. शवागारात आणखी 13 हून अधिक मृतदेह ठेवण्यात आले असून त्यांचा अहवाल अद्याप आला नाही. अहवाल आल्यानंतरच त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला की आणखी अशामुळे हे स्पष्ट होणार आहे.
अथणी तालुक्मयात गुरुवारी सर्वाधिक रुग्ण
गुरुवारी रात्रीपर्यंत जिल्हय़ातील 120 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते.. राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थबुलेटिननुसार हा आकडा 92 इतका होता. अथणी येथे 22 रुग्ण आढळून आले आहेत. तर तालुक्मयातील मोळे, मंगसुळी, कौलगुड्ड, कोकटनूर, ऐगळी, रड्डेरहट्टी, चिक्कट्टी, शिरगुप्पी, मायेनट्टी, शिवनूर, पार्तनळ्ळी, बाळीगेरी येथील रुग्णांचा यामध्ये समावेश आहे.
अथणी तालुक्मयात रुग्ण संख्या झपाटय़ाने वाढत आहे. महाराष्ट्राच्या सीमेवरील गावात बाधितांची संख्या वाढती आहे. महाराष्ट्रातून व इतर राज्यातून गावी परतलेल्यांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. या सर्व 40 जणांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बाधितांची संख्या वाढल्यामुळे अथणी तालुक्मयात खळबळ माजली आहे.
बेळगावातही संख्या वाढली
120 पैकी बेळगाव शहरातील 15 हून अधिक जणांचा समावेश आहे. सुभाषनगर, माळमारुती, महांतेशनगर, बसवकॉलनी, कुमारस्वामी लेआऊट, राघवेंद्र कॉलनी, खंजर गल्ली, वडगाव, गुरुप्रसाद कॉलनी, वैभवनगर, आझमनगर, कसई गल्ली, सांबरा आदी ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
याबरोबरच बैलहोंगल, निपाणी, चिकोडी, रामदुर्ग, हुक्केरी, सौंदत्ती, शिरगुप्पी येथील कोरोनाबाधितांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
वाढत्या रुग्ण संख्येमुळे सिव्हिल हॉस्पिटल हाऊसफुल्ल झाले आहे. त्यामुळे बाधितांना कोठे हलवायचे? असा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी सिव्हिलमध्ये 200 खाटांची व्यवस्था आहे. रुग्ण संख्या लक्षात घेऊन सर्जिकल इमारतही बाधितांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. तरीही जागा अपुरी पडू लागली आहे.
वचा आकडा 1 हजाराच्या दिशेने
बेळगाव जिल्हय़ातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतो आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत एकूण बाधितांची संख्या 700 हून अधिक होती. 1 हजाराच्या दिशेने जिल्हय़ाची वाटचाल सुरू असून आणखी 2 हजार 755 स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत. हे अहवाल आल्यानंतर बाधितांचा आकडा वाढणार अशी शक्मयता आहे.
खानापूर शहरात कोरोनाचा पहिला बळी
खानापूर : खानापुरातील एका हॉटेल व्यावसायिकाचा गेल्या मंगळवारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला होता. त्याला कोरोना संशयित म्हणून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याचा मृत्यू झाल्यावर त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. सरकारी नियमाप्रमाणे मंगळवारी दुपारी त्याचा अंत्यविधी उरकण्यात आला. मात्र तपासणी अहवाल गुरुवारी पहाटे आला. तो कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने खानापूर तालुक्यात एकाच खळबळ माजली आहे. अहवाल पॉझिटिव्ह येताच पुढील कार्यवाहीसाठी सकाळपासूनच प्रशासनाची धावपळ सुरू झाली.
नगरपंचायत व आरोग्य खात्याच्या कर्मचाऱयांनी तातडीने महामार्गावर त्याचे हॉटेल असलेला परिसर सीलडाऊन केला. वर्दे कॉलनीपासून हॉटेल पंकजपर्यंत सर्व दुकाने सीलडाऊन करण्यात आली आहेत. महामार्गावर त्या परिसरात एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. त्या परिसरातील सर्व दुकाने, हॉटेल व इतर व्यावसायिकांच्या दुकानांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे त्याच्या हॉटेलमध्ये नगरपंचायत, स्टेट बँकेतील कर्मचारी तसेच अनेक लोक चहा-नाष्टय़ासाठी जात होते. गेल्या आठ-दहा दिवसांपासून तो हॉटेलमध्येही आला नव्हता. आजारी होण्यापूर्वी तो धारवाड-हुबळीला नातेवाईकांना भेटण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणाहून आल्यावर तो आजारी पडला. त्याला खोकल्याचा त्रास सुरू झाल्याने त्याची कोरोना टेस्ट घेण्यात आली होती. पण अहवाल निगेटिव्ह आला. यानंतर पुन्हा त्याला अधिक त्रास जाणवू लागल्याने मंगळवारी सकाळी उपचारासाठी बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी कोरोना संशयित म्हणूनच त्याच्यावर उपचार सुरू होते. पण दुपारच्या सुमारास त्याचा रक्तदाब कमी होऊन त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला. तो कोरोना संशयित असल्याने त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता बेळगाव येथेच सरकारी नियमाप्रमाणे त्याचा अंत्यविधी विद्युतदाहिनीमध्ये उरकण्यात आला.
तत्पूर्वी त्याचा स्वॅबही अधिक तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल गुरुवारी पहाटे आल्याने तो पॉझिटिव्ह निघाला. आता त्याच्या संपर्कात जे लोक आले आहेत त्या सर्वांचा शोध घेण्यात येत असून महामार्गावरील सर्व घराघरात जाऊन आरोग्य खात्याने माहिती जमविण्याचे काम सुरू केले आहे. नेहमी त्याच्या संपर्कात येणारे नगरपंचायत कर्मचारी, बँकेचे कर्मचारी तसेच इतरांचे स्वॅबही तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याची खानापूर तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. या आधी 12 दिवसांपूर्वी तालुक्यातील करविनकोप्प गावात रजेवर आलेल्या बीएसएफ जवानाचा अहवालही पॉझिटिव्ह आला होता. त्यालाही उपचारासाठी बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तो आता बरा होऊन घरी परतला आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या 32 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी बहुतेक अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यानंतर हा दुसरा कोरोना पॉझिटिव्ह सापडला होता. पण तो कोरोनाचा बळी ठरला आहे. या दुसऱया घटनेमुळे खानापूर शहरासह तालुक्यामध्ये कोरोनाची धास्ती अधिकच वाढली आहे.
दरम्यान, हॉटेल खानापूर शहरात असले तरी तो लैला शुगर्स परिसरात राहत होता. यामुळे त्या परिसरातही कोरोना व्हायरसचा फैलाव वाढू नये यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे. त्या परिसरातील रहिवाशांचे स्वॅबही तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत.