प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव रेल्वे यार्डमध्ये दुरुस्तीचे काम करण्यात येत असल्याने बेळगाव-शेडबाळ-बेळगाव पॅसेंजर रेल्वे गुरुवार दि. 16 सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. ऐन गणेशोत्सवात पॅसेंजर रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. 30 ऑगस्टपासून ही पॅसेंजर रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल होत असून त्यांच्यावर जादा तिकीट दर देऊन एक्स्प्रेसने प्रवास करण्याची वेळ आली आहे.
हुबळी ते मिरज या दरम्यानच्या पॅसेंजर मागील काही महिन्यांपासून कोरोनामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यानंतर बेळगाव-शेडबाळ-बेळगाव ही पॅसेंजर सुरू करण्यात आली होती. यामुळे काही प्रमाणात का होईना प्रवाशांची सोय झाली होती. परंतु, बेळगाव यार्डमधील दुरुस्तीचे कारण देत 30 ऑगस्टपासून पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे. 16 सप्टेंबरपर्यंत पॅसेंजर धावणार नसल्याची माहिती हुबळी विभागाचे डीआरएम अरविंद मालखेडे यांनी दिली आहे.
पॅसेंजरविना रेल्वेचा प्रवास झाला कठीण
हुबळी ते मिरज मार्गावर अनेक प्रवासी पॅसेंजरने प्रवास करतात. शिक्षण, व्यवसाय, नोकरी, उद्योग, मालाची खरेदी-विक्री अशा विविध कारणांसाठी नागरिक दररोज प्रवास करीत असतात. परंतु पॅसेंजर रेल्वे उपलब्ध नसल्याने प्रवाशांना अधिक तिकीट दर देऊन एक्स्प्रेस रेल्वेने प्रवास करावा लागत आहे. मध्यंतरी नैर्त्रुत्य रेल्वेने बेळगावमधून दोन पॅसेंजर सुरू करण्याबाबत विचार केला होता. परंतु अद्याप या रेल्वे रूळावर आल्या नसल्याने पॅसेंजर सुरू करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.