वार्ताहर / किणये
बेळगुंदी गावचे जागृत देवस्थान श्री रवळनाथ देवाची यात्रा भक्तिमय व उत्साही वातावरणात पार पडली. कोरोनामुळे यंदा यात्रा साधेपणाने मर्यादित करण्यात आली.
दरवर्षी यात्रा तीन दिवस भरविली जाते. यंदा मात्र कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे देवस्थान पंच व यात्रा कमिटीच्या बैठकीत निर्णय घेऊन यात्रा केवळ दोन दिवस साजरी केली.
पालखी मिरवणूक काढून गावातील सर्व देवदेवतांची पूजा अर्चा करण्यात आली. पालखी मिरवणुकीत महिला मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. वारकरी मंडळी ही टाळमृदंगाच्या तालात दंग झालेले पहावयास मिळाले.
कोरोनामुळे बाहेरील पै-पाहुणे व मित्रमंडळी यांना आमंत्रण देण्यात आले नव्हते. देवस्थान जागृत असल्यामुळे पंचक्रोशीतील भाविक दरवर्षी यात्रेला मोठय़ा प्रमाणात येतात. त्यांना मात्र पंच कमिटीने कोणीही यात्रेला येऊ नये, असे आवाहन केले होते. यामुळे ही यात्रा गाव मर्यादित झाली.
गावात काढण्यात आलेल्या पालखी मिरवणुकीचे घरोघरी आरती ओवाळून स्वागत केले. यात्रा साधेपणाने असल्यामुळे यंदाचा महाप्रसाद ही रद्द केला. गावातील भाविकांनी तिर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले.